मुंबईत दिवसेंदिवस अवयवदानाबाबत जनजागृती वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत या वर्षभरातलं ३३वं अवयवदान झालं आहे. एका महिलेने केलेल्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान मिळालं आहे. ५४ वर्षीय उज्वला तिवारी यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना २६ ऑगस्ट रोजी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसऱ्याच दिवशी झाला ब्रेनस्ट्रोक
दुसऱ्याच दिवशी त्यांना ब्रेनस्ट्रोक झाला. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी उज्वला यांना ब्रेनडेड घोषित केले. याची कल्पना नातेवाईकांना देण्यात आली. नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर तात्काळ नातेवाइकांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २८ तारखेला त्यांची किडनी आणि यकृत दान करण्यात आले.
तुम्ही हे वाचलंत का? – अवयव प्रत्यारोपणामुळे ६ महिन्यांत वाचले ९१ जणांचे प्राण
दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये झालं अवयवदान
५४ वर्षीय उज्वला यांच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान मिळाले आहे. त्यांची एक किडनी नानावटी रुग्णालयात मूत्रपिंडावर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला दान करण्यात आली आहे. तर, त्यांचं यकृत ग्लोबल रुग्णालयात दान करण्यात आलं आहे. दुसरी किडनी आकाराने छोटी असल्याकारणाने ती दान करता आली नाही.
राहुल वासनिक, नानावटी रुग्णालयाचे प्रत्यारोपण समन्वयक
याविषयी उज्वला तिवारी यांची मुलगी आश्विनी तिवारी यांनी सांगितलं की, “आईला थोडा त्रास होत होता. म्हणून आम्ही त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केलं. तिला ब्रेनस्ट्रोक झाला. तिचं ह्रदयही सुरू होतं. पण मेंदू मृत झाला. जर व्हेंटिलेटर काढलं तरी त्या वाचू शकणार नव्हत्या. त्यामुळे आम्ही त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा गरजू रुग्णांना होऊ शकेल. म्हणून आम्ही त्यांचे अवयव दान केले.”
तुम्ही हे वाचलंत का? – राधिका आपटे करणार ‘अवयवदान’
गेल्या ८ महिन्यांत ५५ किडनी दान!
२०१८ची आकडेवारी जर पाहिली, तर मुंबईत ऑगस्ट महिन्यापर्यंत तब्बल ५५ किडनीदान शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. याशिवाय ह्रदयदानाच्या १५ शस्त्रक्रिया आणि १ फुफ्फुसदान करण्यात आले आहे. याशिवाय विशेष म्हणजे यकृतदानाच्या ३० शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.
किडनीच्या प्रतिक्षायादीत वाढ
सध्या मुंबईत ३१ रुग्ण ह्रदयाच्या प्रतिक्षेत आहेत, तर ३ हजार ३१३ जणांना किडनीच्या आवश्यकता आहे. ९ जण फुप्फुसाच्या प्रतिक्षेत आहेत. तर, ३७३ जणांना यकृताची आवश्यकता आहे. राज्यातल्या चित्रावर नजर टाकली, तर राज्यभरात सध्या ४३ जणांना ह्रदयाची आवश्यकता आहे. तर, ४ हजार ६६६ रुग्णांना किडनीची आवश्यकता आहे. याशिवाय ९ जणांना फुप्फुसाची आवश्यकता असून ७८९ जणांना यकृताची आवश्यकता आहे.