रिक्षा चालक बाबासाहेब कांबळे याला रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला होता. मात्र या मारहाणीमागे अर्थकारण असल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रत्येक स्टॅन्डवर रिक्षा चालकांकडून पैशाची वसुली केली जाते. त्या वसुलीवरूनच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे रिक्षा चालकांकडील बेकायदेशीर वसुलीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. मात्र रिक्षा चालकांकडून या प्रकरणी भाजप रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळेंना डोंबिवली पूर्व परिसरातल्या शेलार नाका भागात रॉड आणि वायरने मारहाण करण्यात आली होती.
कल्याण-डोंबिवलीत १२ हजार रिक्षा!
कल्याण डेांबिवली शहरात एकूण १२ हजाराच्या आसपास रिक्षा आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या रिक्षा संघटना आहेत. मात्र, शहरात रिक्षा चालकांची मुजेारी खूपच वाढली आहे. अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करणे, भाडे नाकारणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांवर कारवाई व्हावी यासाठी प्रवाशी आरटीओकडे तक्रारी करीत असतात. तसेच कोणतीही कागदपत्रे नसतानाही शेकडो रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. मात्र, या विरोधात आरटीओने कडक भूमिका घेतल्यानंतर रिक्षा संघटना अथवा युनियनचे पदाधिकारी आरटीओ विरोधात आंदोलन करण्याची धमकी देतात. त्यामुळे आरटीओ अधिकारीही कारवाईचा हात आखडता घेतात. त्यामुळे शिस्तीचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांना पाठीशी घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणे गरजेचे आहे. मध्यंतरीच्या काळात आरटीओकडून सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी ९१ स्टॅन्ड मंजूर केल्याची यादी प्रसिद्ध केली होती. पण शहरात बेकायदेशीर स्टॅन्ड मोठया प्रमाणात आहेत.
हेही वाचा – डोंबिवलीत रिक्षाचालकाचे अपहरण करून जबर मारहाण
रिक्षावाल्यांकडून दिवसाला १० रुपयांची वसूली
शहरात जागोजागी बेकायदेशीरपणे स्टॅन्ड उभारूनही त्याकडे आरटीओ आणि वाहतूक पोलीस कानाडोळा करतात. बेकायदेशीर स्टॅन्डवर युनियनच्या पदाधिकाऱ्याची मक्तेदारी सुरू होते. स्टॅन्डवर रिक्षा लावणाऱ्या प्रत्येक रिक्षा चालकाकडून दररोज १० रूपये वसूल केले जातात. प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी हे त्या त्या स्टॅन्डवरून वसुली करीत असतात. दररोज हजार ते दीड हजार रूपये जमा होतात. मात्र, एखाद्या रिक्षा चालकाने पैसे देण्यास मनाई केल्यास त्याला स्टॅन्डवर रिक्षा लावण्यास मज्जाव केला जातो. मात्र, अनेक रिक्षा चालक इच्छा नसतानाही निमूटपणे दहा रूपये देतात. संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचे रोजचे पाचशे ते हजार रूपये उत्पन्न या वसुलीतूनच होत असते. रिक्षा चालकांकडून अशा प्रकारे पैशाची वसुली करणे हे बेकायदेशीर आहे. मात्र रिक्षा चालकांची तक्रार नसल्याने कायदेशीर कारवाई करता येत नाही असे पोलीस आणि आरटीओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्डवर आरटीओ अथवा वाहतूक पेालिसांनी कारवाई केल्यास या प्रकाराला आळा बसेल, अशी मागणी प्रवाशांकडून हेात आहे.