मुंबईः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) गटाच्या अध्यक्षपदी छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यामुळे दलित संघटनेचा हा गट नेमका कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दीपक निकाळजे हे आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. गेली २० वर्षे ते आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. राजकारणातही ते कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत ते आधी काम करत होते. नंतर मंत्री आठवले यांच्यापासून वेगळे होऊन निकाळजे यांनी स्वतःचाच गट स्थापन केला. या गटाचे मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरात चांगले वर्चस्व आहे. दीपक भाऊ निकाळजे प्रतिष्ठान हा स्वतंत्र्यरित्या सामाजिक कार्यात सक्रिय आहे.
चेंबूर येथे बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) गटाची परिषद होती. या परिषेदत देशभरातील ३० राज्यांमधून आरपीआयचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्या परिषदेत सर्वांनुमते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक निकाळजे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर निकाळजे यांनी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली. आंबेडकरी विचारांच्या सर्वच नेत्यांंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन दीपक निकाळजे यांनी केले.
पुढे निकाळजे म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीची आम्ही तयारी सुरु केली आहे. अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच आगामी सर्वच निवडणुका लढवण्याचे आम्ही नियोजन करत आहोत. आमच्या पक्षाचे आमदार, खासदार निवडून येतील. आरपीआय(ए) गटाचे हे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आहे. तसेच मी अध्यक्ष झाल्यानंतरचे हे पहिले अधिवेशन आहे. आमचा पक्ष १९९० पासून आहे. पण पक्ष वाढला नाही. त्याची कारणे आम्ही शोधली. त्या कारणांवर तोडगा काढून आम्ही आता पक्ष वाढीसाठी काम करणार आहोत. आम्हाला कोणी युती, आघाडीसाठी विचारले तर पक्षाचे हित बघूनच निर्णय घेतला जाईल, असे निकाळजे यांनी स्पष्ट केले.