लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून मुंबईची लोकल कारशेडमध्ये उभी होती. मात्र श्रमिक ट्रेनची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्याने घेतल्यानंतर, रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकार्यांना उपस्थिती वाढविण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारपासुन पहिली विशेष लोकल चालविण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्मचारी जास्त आणि लोकल कमी असल्यामुळे शुक्रवारी रेल्वे कर्मचार्यांची कर्तव्यांवर जात असताना लोकलचा गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यासंबंधीत व्हिडीओ सुद्धा सोशल माध्यमांवर व्हायरल झाले असून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. या घटनेमुळे रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.
लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या नागरिकांसाठी १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेर्या सुरु करण्याची घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉप मधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचार्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. रेल्वे कर्मचार्यांना कामावर येण्यासाठी मध्य रेल्वेकडून कर्जत ते सीएसएमटी, कसारा ते सीएसएमटी आणि पनवेल ते सीएसएमटी अशा एकूण १४ लोकल फेर्या चालविण्यात येत आहेत. मात्र कर्मचारी संख्या जास्त असल्यामुळे रेल्वे कर्मचार्यांना लोकलमध्ये आसन मिळत नाही. त्यामुळे त्यांना उभे राहून प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय आहे घटना ?
रेल्वे कर्मचार्यांची ड्युटी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांची असते. रेल्वे कर्मचार्यांसाठी सकाळी एकच लोकल असल्याने या लोकलमध्ये रेल्वे कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशी माहिती प्रवास करणार्या एका रेल्वे कर्मचार्याने ‘दैनिक आपलं महानगर’ला दिली. तसेचही लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकावर पूर्ण भरते. त्यामुळे रेल्वे कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात आले असून रेल्वे कर्मचार्यांनी सकाळी ड्युटी करणार्या कर्मचार्यांसाठी लोकल फेर्या वाढविण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.
तीन दिवसात पूर्ण कारशेड
रेल्वेचे लोअर परळ वर्कशॉप , महालक्ष्मी वर्कशॉप, मुंबई सेंट्रल, कोरशेड व कोच केअर सेंटर आणि बांद्रा टर्मिनस कोच केअर सेंटर येत्या दोन ते तीन दिवसांत सुरु करण्यात येणार आहेत. या वर्कशॉप आणि कोच केअर सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे लोकल फेर्या वाढवण्यात येणार आहेत.
वेळोवेळी रेल्वे कर्मचार्यांना सोशल डिस्टसिंग पाळण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे कर्मचार्यांनी सुचनांचे पालन करून सहकार्य करावे.
-ए. के. जैन, वरिष्ठ जनसपंर्क अधिकारी, मध्य रेल्वे.