मुंबईः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फार काळ कोणीही कटुता ठेवू शकत नाही. त्यामुळे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कटुता दूर करण्यासाठीच शरद पवार यांच्यासोबत प्रवास केला असावा. कुटुता दूर करण्यासाठी फडणवीस यांनी टाकलेले हे पहिले पाऊल असावे, असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केले.
शरद पवार व देवेंद्र फडणवीस हे रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. एकमेकांंवर सतत टीका करणारे नेते एकाच गाडीतून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. अनेकांंनी या भेटीचे कौतुक केले तर काहींनी या प्रवासावर टीका केली.
खासदार संजय राऊत यांना या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, शरद पवार हे राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. राजकीय कटुता मिटवायला हवी, असे फडणवीस म्हणाले होते. शरद पवार व फडणवीस यांची भेट म्हणजे राजकीय कटुता मिटवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असावे आणि त्यात काही वाईट आहे, असे मला वाटत नाही. उलट फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे.
राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. राज्य घटनेतील तरतुदींची व पक्षांतर कायद्याची मोडतोड करुन महाराष्ट्रात सत्तांतर झाले. या सत्तांतराला कायद्यानुसार कोणताच आधार नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सध्या न्याय व्यवस्थेत काय सुरु आहे हे सर्वश्रुत आहे. तरीही काही न्यायाधीश हे न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारे निर्णय देत आहेत. त्यामुळे आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचा दिल्लीतील महाशक्तीवर दृढ विश्वास आहे. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. किती दिवस सुनावणी पुढे ढकलली जाणार आहे. एक दिवस असा येईल की सत्ताधाऱ्यांना फटका बसेल. महाशक्ती व न्याय व्यवस्था असा हा संघर्ष सुरु आहे. त्यात न्याय व्यवस्थेचाच विजय होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
सध्या सुडाचे राजकारण सुरु आहे. गेल्या ६०-६५ वर्षात असे सुडाचे राजकारण महाराष्ट्राने बघितले नाही. तसेच भ्रष्ट नेत्यांना काढण्यासाठी किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी मंत्रिमंडळात बदल केले जातात. त्यापलिकडे काही होत नाही, असेही संजय यांनी सांगितले.