राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत (आरएनटीसीपी) जर एखादा व्यक्ती ’अॅक्टिव्ह टीबी’ रुग्णाला तपासणी आणि पुढील उपचारांसाठी समोर घेऊन आली, तर त्याला ५०० रुपये देण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून अशा आशयाचे पत्रक जारी करण्यात आले आहे. आरोग्य विभागातील अधिकार्यांच्या मते टीबी रुग्ण आणि उपचार यादरम्यानची निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
भारतात दिवसेंदिवस टीबी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ सालापर्यंत टीबीमुक्त भारत करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार, अनेक उपाययोजना राबवल्या जात आहे. त्यामध्ये सरकारकडून टीबी रुग्णांना ५०० रुपये देण्याची योजना, त्यासोबत खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि फार्मासिस्टना ५०० रुपये मानधन ही योजना आणि आता कोणत्याही सामान्य माणसाने जर टीबी रुग्ण समोर आणला तर त्यालाही ५०० रुपये मानधन म्हणून देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. तसेच त्यांना ’ट्रिटमेंट प्रोव्हायडर’ असे संबोधले जाणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या प्राचार्य डॉ. पद्मजा जोगेवार यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ ला सांगितले.
ही योजना नव्याने राबवली जात आहे. याआधी खासगी हॉस्पिटलमधील टीबी रुग्णांची माहिती सरकारकडे द्यावी यासाठी खासगी डॉक्टरांना आणि फार्मासिस्टना मानधन देण्याची योजना राबवली. त्यानंतर आता सामान्य व्यक्तीही जर एखाद्या टीबी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली तर तिला त्या रुग्णाची ट्रिटमेंट पूर्ण झाल्यावर ५०० रुपये मानधन म्हणून दिले जाईल. त्यासाठी त्याचे बँक अकांऊंट डिटेल्स घेतले जातील आणि त्याच्या खात्यात ते पैसे जमा केले जातील. शिवाय, ज्यावेळेस सामान्य माणूस टीबी रुग्णाला घेऊन येईल त्यावेळेस त्या रुग्णाच्या तपासण्या केल्या जातील. त्याला टीबी आहे हे कन्फर्म झाले की, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात येतील, असे सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या प्राचार्य डॉ. पद्मजा जोगेवार म्हणाल्या.
अॅक्टिव्ह टीबी रुग्ण म्हणजे कोण ?
ज्यांना टीबी असतो मात्र ती बाब कुठल्या ना कुठल्या कारणांनी समोर येत नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात अॅक्टिव्ह टीबी रुग्णांची संख्या जास्त आहे. जगात सर्वात जास्त अज्ञात टीबी रुग्ण भारतातून समोर येत आहेत. जगात टीबीच्या ४ केसपैकी १ केस ही भारतातील आहे. त्यामुळे सरकार अशा अज्ञात टीबी रुग्णांना शोधण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना आखत आहे.
देशात टीबी रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी सामान्य माणसांनीही जर पुढाकार घेतला तर टीबीला लवकरात लवकर आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. सामान्य माणसांनी अशा केसेस पुढे आणल्या आणि त्यांच्या उपचारांनतर त्यांना ५०० रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहेत. हा केंद्राचा निर्णय आहे जो लागू झाला आहे.
– डॉ. संजीव कांबळे , संचालक , सार्वजनिक आरोग्य विभाग