घरमुंबईराज्यात लवकरच इको टुरिझम सर्किट

राज्यात लवकरच इको टुरिझम सर्किट

Subscribe

राज्यात १२४ वन उद्याने, ४३ ऐतिहासिक किल्ले, ६ व्याघ्र प्रकल्प, ३३ वन्यजीव अभयारण्ये, ५२ धार्मिक स्थळे, ५५ निसर्ग पयर्टन स्थळे, ५ हिल स्टेशन्स आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे मुंबई महापालिकालगतचे उद्यान आहे. महाराष्ट्र हे गड-किल्ले, सागरतटीय पर्यटन, जंगलभ्रमंती, अध्यात्मिक पर्यटन, साहसी पर्यटन यांसारख्या सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य असून राज्यात ‘इको टुरिझम सर्किट’ विकसित करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्रातील ४३ निसर्ग पर्यटन स्थळांचा परिपूर्ण विकास करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आणखी १३९ निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधीचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील ३४७ निसर्ग पर्यटन स्थळांपैकी १८९ पर्यटनस्थळांचे आराखडे मंजूर झाले आहेत. यासाठी ३५१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, त्यापैकी २८४ कोटी रुपये आजवर खर्च झाले असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. तर स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन हे राज्याचे मोठे शक्तीस्थान आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच निसर्ग पर्यटन मंडळ विविध उपक्रम राबवत असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

निसर्ग पर्यटनाकडे लोकांचा असलेला कल लक्षात घेऊन त्यांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ मध्ये महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय बाबी लक्षात घेऊन जबाबदार निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. होम स्टे, पर्यटक मार्गदर्शक, पर्यटकांसाठीची वाहने यांसारख्या विविध प्रकारांतून स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता करून दिली जात आहे. वनांच्या बफर आणि कॉरिडोर क्षेत्राचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास केल्यास पर्यटकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील. राज्याच्या वनक्षेत्रात असलेल्या किल्ल्यांमध्ये साहसी खेळांना चालना देण्यात येणार आहे. निसर्ग पर्यटन मंडळाकडून निसर्गानुभव उपक्रम राबविला जातो. जिल्हा परिषद आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी जंगलभ्रमंतीसाठी नेले जाते. त्यांना वन आणि वन्यजीवांचे महत्व सांगून संरक्षण आणि संवर्धनात सहभागी करून घेतले जाते.

२८८ जागांसाठी तयारी सुरु
शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होणार असल्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असतानाच भाजपकडून ‘एकला चलो रे’चे संकेत पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा त्याबद्दलचे सूतोवाच करताना आमची २८८ जागांवर तयारी सुरु असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचविल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -