मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी विभागात खासकरुन महिलांच्या डब्यांमध्ये विनातिकीट प्रवासी आणि इतर अनियमितता शोधण्यासाठी १७ ऑगस्ट २००१ रोजी ‘तेजस्विनी’ या नावाची महिलांची तिकीट तपासणी पथके स्थापन केली. या पथकांनी विनाटिकीट प्रवास करणार्या महिलाकडून २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ३.४३ कोटी दंड वसूल केला आहे.
तेजस्विनी पथकांची उत्कृष्ट कामगिरी
उपनगरी गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे काम करणे पुरुष तिकीट तपासणीसांनादेखील एक आव्हान असते. परंतु महिला तिकीट तपासणीसांची बॅच बनवण्याच्या प्रशासनाच्या हालचालीमुळे फार चांगले परिणाम दिसून आले. कारण तेजस्विनी पथकाने विनातिकिट प्रवाशांना शोधून त्यांच्याकडून दंड वसूल करुन उत्कृष्ट कामगिरी दाखविली. तसेच उपनगरी गाड्यांच्या लेडीजच्या डब्यांमध्ये हॉकर्स, भिकारी इत्यादींचा प्रवाशांना होणारा त्रासही मोठ्या प्रमाणात कमी झाला. तेजस्विनी पथकाने २०१९-२०२० या आर्थिक वर्षात तेजस्विनी पथकांच्या कामगिरीत दंडांच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत २४.६९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २.७५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तर या वर्षी ३.४३ कोटी दंड वसूल केला आहे. केसेसच्या बाबतीत ५.९७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील १.१७ लाख केसेसच्या तुलनेत या वर्षी १.२४ लाख केसेसची नोंद झाली आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० दरम्यान तेजस्विनी पथकांनी विनातिकिटांची ५ हजार ११९ प्रकरणे शोधली आणि त्यांच्याद्वारे १३ लाख १८ हजार ९९१ रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला.