घरमुंबईरायगडावरील महाराजांच्या दर्शनाने राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरुवात

रायगडावरील महाराजांच्या दर्शनाने राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरुवात

Subscribe

साधारण ४०० वर्षांपूर्वी भारतात दिल्लीमध्ये एकच बादशाह होता; पण, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून देशात पहिले परिवर्तन केले. त्याकाळी शिवरायांनी रायगडावरून पहिली परिवर्तनाची सुरुवात केली. आज दिल्लीत नरेंद्र मोदी नामक तुघलकी निर्णय घेणारे बादशाह लोकशाहीत हुकूमशाही पद्धतीने भारतावर राज्य करत आहेत. तसेच मुंबईचे सरकारही हुकूमशाहीचे आहे, त्यामुळे आज रायगडपासून या हुकूमशाही सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तनाची लढाई असल्याचे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा गुरुवार, १० जानेवारी रोजी महाड येथून शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरकारने साडेचार वर्षांत पदोपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. शिवस्मारकाची अजून एकही वीट ठेवली गेली नाही. शिवाजी महाराज यांच्या नावे कर्जमाफी जाहीर केली. मात्र शेतकर्‍यांना मदत काही मिळाली नाही. हा महाराजांचा अपमान असल्याचे मुंडे म्हणाले.

- Advertisement -

देशाचा विकास करण्याची भाषा यांनी केली होती कोकणचा विकास झाला आहे का? यावर्षी जर निवडणूक नसत्या तर पेट्रोलने शंभरी पार केली असती. चारशे रुपयांचा सिलिंडर आज हजारला विकला जात आहे. ही लूट आहे, ही लूट छोटी नाही. यांनी देशाला, राज्याला बरबटून खाल्लं, असा हल्ला मुंडे यांनी केला.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विद्या चव्हाण, आमदार जितेंद्र आवाड, पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -