स्फोटकांची स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी अनुक्रमे एनआयए, एटीएस तपास करत आहे. एनआयए आणि एटीएसला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करत आहे. राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणात लक्ष्य घालून आहेत. तसेच या प्रकरणात दोषींवर योग्य कारवाई करेल. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही,असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांना सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख हे शुक्रवारी तातडीने नवी दिल्ली येथे गेले. त्यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी बोलावले असल्यामुळे देशमुख दिल्लीला गेल्याची चर्चा होती. अनिल देशमुख यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या भेटीचे कारण प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामध्ये शरद पवारांशी दोन मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी माहिती घेतली. एनआयएला आणि एटीएसला राज्य शासनाचे सहकार्य करत असल्याचे मी पवारसाहेबांना सांगितले. राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य या प्रकरणात दोन्ही यंत्रणांना होत आहे. पण तपास जोवर पूर्ण होत नाही, तोवर काही सांगता येणार नाही. तपासात ज्या गोष्टी समोर येतील त्यावर पुढील कारवाई राज्य शासन करेल, असे देशमुख म्हणाले.
तसेच दिल्लीमध्ये इंडस्ट्रीज विभागाकडून मिहान प्रकल्पाच्या निमित्ताने काही आंतरराष्ट्रीय कंपन्या विदर्भात येऊ पाहत आहेत. म्हणूनच या विषयावर अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी मी पवार साहेबांची भेट घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अनेक तालुके आणि जिल्ह्यात अॅन्सेलरी उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच केंद्राच्या उद्योग विभागाची कशी मदत मिळवता येईल हा भेटीचा उद्देश होता. मिहान प्रकल्पाचे डिटेल्स पवार साहेबांना दिले. मोठी इंडस्ट्री विदर्भात येऊ शकेल यासाठीचे मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.
गच्छंतीबाबत देशमुखांचे मौन
मुंबई पोलीस आयुक्तपदी असलेले परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर अनिल देशमुख यांची गच्छंती होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच अनिल देशमुख यांनी अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी वरिष्ठांच्या नाराजीचा प्रश्न विचारला असता अनिल देशमुख यांनी गप्प राहणे पसंत केले. कोणतीही प्रतिक्रिया न देता ते काहीच न बोलता निघून गेले.