नदीम शेख, पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापतीच्या निवडणुका होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन सुध्दा विषय समितीच्या नेमणूका अद्याप झालेल्या नसल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष शिवा सांबरे यांनी जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सदस्यांची नेमणुकीची कार्यवाही त्वरीत करावी, अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.
माजी उपाध्यक्ष शिवा सांबरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पालघर जिल्हा परिषदेत, अनुकंपा भरती, शिक्षक भरती, १० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी भरती, सरळ भरती तसेच विविध विभागाच्या पदोन्नती या बाबी वर्षानुवर्ष प्रलंबित असून त्याकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचा कारभार हा ढिसाळ होत चालला आहे, अशी चर्चा जनसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. या सर्वच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व जिल्हा परिषद सदस्यांचे असलेले अधिकार व कर्तव्य बजावण्यासाठी विषय समितीच्या सदस्यांची मुद्दामहून नेमणुका होत नाही असे लक्षात येत आहे. तरी उपरोक्त बाब गंभीर स्वरुपाची असून पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना त्यांचे अधिकार व हक्क बजावण्यासाठी व लोकांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी विषय समितीच्या सदस्यांची नेमणुकीची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.