वाणगाव : पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील बोईसर परिसरात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांची बॅनरबाजी सुरूच आहे. पालघर जिल्ह्यातील ३४३ ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना काढून जाहीर केली आहे.१३ ऑक्टोबर रोजी होणार्या या निवडणुकांसाठी २१ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण पालघर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करणारे सर्व राजकीय कार्यक्रम आणि प्रसिद्धी यांच्यावर निर्बंध घालण्यात आले असून, निवडणूक निर्णय अधिकार्यांची अधिकृत परवानगी घेतल्यानंतरच राजकीय पक्षांना बॅनर लावता येणार आहेत. मात्र असे असताना देखील आदर्श आचारसंहीतेचे सर्रास उल्लंघन करून बोईसर आणि सरावली ग्रामपंचायत क्षेत्रात ओत्सवाल एंपायर आणि मुकुट टँक पेट्रोल या ठिकाणी राजकीय पक्ष आणि राजकीय पदाधिकारी यांचे स्थानिक ग्रामपंचायत ना हरकत दाखला आणि वीना परवानगी लावलेले बॅनर दिमाखात झळकत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांच्या शेजारी बेकायदेशीर बॅनर आणि होर्डींग लावून परिसर विद्रूपीकरण कारणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन देखील स्थानिक ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर या आदेशाकडे डोळेझाक करीत असून यामुळे बोईसर परिसरात बेकायदा बॅनरबाजीने अक्षरक्ष उच्छाद मांडला आहे. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहीता काळात देखील बोईसर परिसरात राजकीय नेत्यांची बॅनरबाजी कायम असून या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.