घरपालघरकस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींची भर उन्हात पाण्यासाठी पायपीट

कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींची भर उन्हात पाण्यासाठी पायपीट

Subscribe

या विद्यालयातील विद्यार्थिनींना भर उन्हात पाणी आणण्यासाठी गावच्या विहिरीवर जावे लागत असल्याने दमछाक होऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.

जव्हार: जव्हार तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीटंचाईचे चटके लहान मुलांनाही सोसावे लागत आहेत. शाळा सोडून भर उन्हात वणवण करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असून पाण्यासाठी शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. हंडाभर पाण्याकरिता मुलांची पाटी फुटल्याचे वास्तव जव्हार तालुक्यात समोर आली आहे. गोरठण येथे कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील तीनशे आदिवासी मुलींना शिक्षण सोडून पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना निवासी शिक्षणाची सोय ही गोरठण या गावात सुसज्ज इमारत बांधून करण्यात आली. मात्र त्यावेळी पाणी प्रश्न कसा सोडवावा अशी ठोस उपाय योजना नसल्याने या विद्यालयातील विद्यार्थिनींना भर उन्हात पाणी आणण्यासाठी गावच्या विहिरीवर जावे लागत असल्याने दमछाक होऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.
    दरम्यान पालघर जिल्हा परिषदेने निवासी शाळेसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर केली. मे २०२३ मध्ये कामाचा कार्यारंभ आदेशही दिला. ग्रामपंचायत गोरठणच्या मालकीच्या जलस्वराज्य योजनेतून २००७ साली बांधण्यात आलेली जुनी विहीर पाडून तिथेच नवीन विहीर बांधण्याचे ठरले होते. परंतु गावातील काही व्यक्तींनी या कामास विरोध केल्याने हे काम आजतागायत सुरू झालेले नाही. त्यामुळे आदिवासी मुलींना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या महिन्यात दूषित पाण्यामुळे शाळेतील १५ ते १६ आदिवासी मुलींना उलट्या व जुलाबचा त्रास झाला होता. त्यामुळे शासनाने आदिवासी मुलींच्या जीवाशी न खेळता पाणी योजना तातडीने मार्गी लावावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
शिक्षणाचा खेळखंडोबा
मुलींच्या वसतिगृहात पाणीच येत नसल्याने , त्यांना शिक्षण सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विद्यालय आणि वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येथील शिक्षकांनी जिल्हा परिषद व पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र मंजूर पाणी योजनेच्या विहिरीसाठी जागा मिळत नसल्याने मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
माझी मुलगी ही कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयात शिक्षण घेत आहे, मात्र तिथे पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना जावे लागते. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींच्या पायाला दुखापत झाली आहे, ही समस्या सुटावी म्हणून प्रशासन स्तरावर पाणी व्यवस्थेचे ठोस धोरण अवलंबणे गरजेचे आहे.
    के.धामोडा, पालक
गोरठण येथील कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील साधारण तीनशे आदिवासी मुली प्रशिक्षण घेत आहेत. येथे पाणी व्यवस्था व्हावी म्हणून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
     डी.एस. चित्ते, गट विकास अधिकारी, जव्हार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -