वाडा नगरपंचायतीने आपल्या हद्दीतील फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येत असलेल्या दैनंदिन बाजार करात तब्बल दहा पट वाढ केल्याने फेरीवाल्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. करात वाढ झाल्याने खेड्यापाड्यातून येणाऱ्या गोरगरीब आदिवासींवर अन्याय होणार असल्याची तीव्र प्रतिक्रीयाही व्यक्त केली जात आहे. वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बाजारातील फिरते व्यापारी किंवा रस्त्याच्याकडेला दुकान मांडून बसलेले विविध व्यापारी यांचा पूर्वीचा बाजार कर दहा रुपये प्रति दिवस होता. तर ग्रामपंचायत काळात हाच दर पाच रुपये प्रति दिवस होता. नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून बाजार कर पाच रुपयावरून दहा रुपये करण्यात आला होता. तर आज नगरपंचायतीला चार वर्षे उलटून गेल्यानंतर बाजार करात दहा रुपये प्रति दिवस पन्नास रुपये व शंभर रुपये प्रति दिवस असा करण्यात आला आहे.
स्वतःच्या शेतात भाजीपाला पिकवून दिवसाचे शंभर दोनशे रुपये मिळवणाऱ्या गरीब शेतकऱ्यांकडून नवीन बाजार कर आकाराने हा त्यांच्यावर अन्याय होईल. त्यांच्याकडून बाजार कर आकारू नये.
– अनंता वणगा, अध्यक्ष, आदिवासी मुक्ती मोर्चा संघटना
टोपली घेऊन बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दहा रुपये, मोठ्या दुकानदारांकडून पन्नास रुपये तर शेड, छत, शटर असलेल्या बंदिस्त दुकानदारांकडून शंभर रुपये प्रति दिवस बाजार कर आकाराला जाणार असल्याची घोषणा ध्वनिक्षेपकातून करण्यात येत आहे. हे कर एप्रिल महिन्यापासून आकारले जाणार आहेत. याबाबत व्यापाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नगरपंचायतीला आर्थिक उत्पन्नाचे अनेक सोर्सेस आहेत. त्याचा नगरपंचायतीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. खेड्यापाड्यातून शंभर-दोनशे रुपयांची भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बाजार कराच्या नावाने पैसे उकळणे हे योग्य नाही. या प्रकारचा वाडा व्यापारी संघाच्यावतीने निषेध करत आहोत.
– अनंता (बंड्या) सुर्वे, सल्लागार, वाडा व्यापारी संघ