भाईंदर :- काशिमीरा पोलिसांनी मोबाईल स्नॅचिंग करणार्या टोळीस अटक करत त्यांच्या कडून २७ फोन व एक रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तसेच तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीला अटक करण्यात काशिमीरा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. याआधी काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ अनोळखी इसमांनी रिक्षातून येत रस्त्यावर चालणार्या देव शर्मा यांना लक्ष्य करत त्यांना शिवीगाळ, मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल फोन चोरल्याची तक्रार शर्मा यांनी केली होती. त्यानंतर काशिमीरा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी इरशाद अन्सारी,मोहसीन खान, शाहीद अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे. तर सदरील गुन्ह्यातील दोन आरोपींवर रेल्वे पोलिसात ११ गुन्हे दाखल आहेत.
तसेच त्यांच्याकडून चौकशी दरम्यान २७ चोरीचे मोबाईल व एक रिक्षा असा एकूण २ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर सदरील कारवाई ही परिमंडळ – १चे पोलीस उपआयुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पोलीस उप निरीक्षक निखिल चव्हाण व प्रकाश कावरे, पोलीस हवालदार सचिन हुले, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविंद्र कांबळे, प्रविण टोबरे सर्व नेमणूक काशिमीरा पोलीस ठाणे व पो.हवा. जयप्रकाश जाधव यांनी केलेली आहे.