आयपीएल स्पर्धा आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून प्ले-ऑफला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. गुरुवारी होणाऱ्या क्वालिफायर-१ च्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सपुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. मुंबईच्या संघात बरेच अनुभवी खेळाडू असल्याने या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबईला झुंज देईल याची दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला खात्री आहे. तसेच अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या समावेशाने आमचा संघ अधिक मजबूत झाल्याचेही धवनने सांगितले.
रहाणेच्या समावेशाने आमचा संघ अधिक मजबूत झाला आहे. रहाणेमुळे आमच्या फलंदाजीला स्थिरता मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात रहाणेने उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या गाठीशी बराच अनुभव आहे. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूंमुळे मला डावाच्या सुरुवातीला माझा नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक मिळते. मी आक्रमक शैलीत फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दबाव टाकू शकतो, धवन म्हणाला. रहाणेला सुरुवातीच्या काही सामन्यांत चांगली कामगिरी करता येत नव्हती. मात्र, त्याने बंगळुरूविरुद्ध ६० धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला धवनने ५४ धावा करत चांगली साथ दिली होती.
धवनने यंदाच्या मोसमात अप्रतिम कामगिरी केली असून १४ सामन्यांत ५२५ धावा केल्या आहेत. या कामगिरीबाबत धवन म्हणाला, मी आयपीएलच्या मागील चार मोसमांत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, यंदाच्या स्पर्धेची खास गोष्ट म्हणजे मी सलग दोन शतके केली. कामगिरीत सातत्य राखून संघाला चांगली सुरुवात करून देण्याचे माझे नेहमीच लक्ष्य असते. यंदा मला अपेक्षित कामगिरी करण्यात यश आले आहे.