भारताविरुद्धच्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ एकही सामना जिंकू शकणार नाही, असे विधान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने केले. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत आणि अखेरचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. या मालिकेत इंग्लंडचे फिरकीपटू भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकणार नाहीत, असे गंभीरला वाटते. इंग्लंडकडे मोईन अली, डॉम बेस आणि जॅक लिच हे तीन फिरकीपटू आहेत. मोईन इंग्लंडचा सर्वात अनुभवी फिरकीपटू असून त्याने ६० कसोटीत १८१ विकेट घेतल्या आहेत. बेस आणि लिच यांना मात्र भारतात खेळण्याचा अनुभव नाही.
डे-नाईट कसोटी जिंकण्याची संधी, पण…
इंग्लंडकडे असलेले फिरकीपटू पाहता त्यांना आगामी कसोटी मालिकेत एकही सामना जिंकता येणार नाही. भारताचा संघ ही मालिका ३-० किंवा ३-१ असा जिंकेल. डे-नाईट कसोटीत इंग्लंडला जिंकण्याची संधी आहे. परंतु, हा सामनाही ते जिंकतील हे निश्चित नाही, असे गंभीर म्हणाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाईट कसोटी अहमदाबाद येथे २४ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे.
अश्विनविरुद्ध खेळणे आव्हान
जो रूटने श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी केली. परंतु, जसप्रीत बुमराह आणि अश्विनसारख्या गोलंदाजांविरुद्ध धावा करणे रूटला सोपे जाणार नाही. अश्विनने ऑस्ट्रेलियात उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. त्याच्याविरुद्ध खेळणे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान असेल, असेही गंभीरने सांगितले.
हेही वाचा – कसोटी मालिका भारतच जिंकणार; इंग्लंडच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत