चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५७८ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना भारताचा पहिला डाव ३३७ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी मिळाली होती. मात्र, असे असतानाही त्यांनी भारताला फॉलोऑन दिला नाही. तसेच त्यांनी दुसऱ्या डावातही बराच काळ फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर बरीच टीकाही झाली. मात्र, रिषभ पंतची भीती असल्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात दीर्घ काळ फलंदाजी केल्याचे सामना संपल्यावर कर्णधार रूटने मान्य केले. इंग्लंडचा चौथ्या डावात भारताला ४०० हून अधिक धावांचे आव्हान देण्याचा प्रयत्न होता, असे रूट म्हणाला.
धावा रोखण्याचा दबाव नको
आम्हाला भारताला ४०० हून अधिक धावांचे आव्हान द्यायचे होते. रिषभ पंत एक सत्र खेळला, तरी त्याच्यात सामना भारताच्या दिशेने फिरवण्याची क्षमता आहे. मला आमच्या गोलंदाजांवर धावा रोखण्यासाठी दबाव टाकायचा नव्हता. त्यामुळे आम्ही अधिक धावा केल्या, जेणेकरून गोलंदाज विकेट घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. आम्ही विकेट घेण्याच्या संधी निर्माण करू हे मला ठाऊक होते, असेही रूट म्हणाला.
सामना गमवायचा नव्हता
आम्ही आमचा दुसरा डाव लवकर घोषित करू शकलो असतो. मात्र, या सामन्याचे दोनच निकाल लागतील (इंग्लंडचा विजय अथवा सामना अनिर्णित) हे मला सुनिश्चित करायचे होते. आम्ही डाव घोषित न केल्याने चौथ्या दिवसअखेर आम्हाला फार षटके टाकावी लागली नाहीत. त्यामुळे पाचव्या दिवशी आम्ही गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा चेंडू बऱ्यापैकी नवा होता, असे रूटने सांगितले.
हेही वाचा – पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा ‘या’ कारणांमुळे पराभव!