भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत सतत चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा भारतामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यंदा ऑक्टोबर भारतात ही स्पर्धा होणार आहे. परंतु, काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले होते. त्यानंतर टी-२० वर्ल्डकप भारतातून हलवून युएईमध्ये घेण्याबाबत चर्चा सुरु झाली होती. आता टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. ही स्पर्धा भारतातच व्हावी यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.
२९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सदस्यांना याबाबत पत्र पाठवले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आगामी क्रिकेट मोसमाबाबत चर्चा करण्यासाठी ही सभा बोलावल्याचे या पत्रात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) १ जून रोजी बैठक होणार आहे. त्याआधी टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत चर्चा व्हावी या हेतूने बीसीसीआयने २९ मे रोजी ही विशेष सर्वसाधारण सभा बोलावल्याचे समजते.
टी-२० वर्ल्डकपसाठी युएईचा पर्याय
भारतातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार आयसीसी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपबाबतचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. यंदा टी-२० वर्ल्डकप भारतात न होऊ शकल्यास आयसीसीपुढे युएईचा पर्याय आहे. युएईमध्ये आयपीएलचा मागील मोसम यशस्वीरीत्या पार पडला होता. त्यामुळे यंदाच्या टी-२० वर्ल्डकपसाठी युएईलाच पसंती मिळू शकेल.