मेलबर्नवर सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने त्रिशतकी मजल मारली आहे. भारताने पहिल्या डावात कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जाडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून पहिला धक्का देखील बसला आहे. उमेश यादवने ज्यो बर्न्सला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद करत तंबूत धाडलं. ज्यो बर्न्सने केवळ चार धावा केल्या.
बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर आटोपला. भारताकडून बुमराने सर्वाधिक चार गडी बाद केले. आश्वीन ३, सिराज २ आणि जाडेजाने १ गडी बाद केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला बाद केल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, भारताची पहिल्ा डावाची सुरुवात खराब झाली. सलामिवीर मयंक अग्रवाल शुन्यावर बाद झाला. त्यानंतर कसोटीत पदार्पण करणारा युवा खेळाडू शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने भरताचा डाव सावरण्याच प्रयत्न केला. मात्र, पॅट कमिन्सने गिलला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. कमिन्सने गिलला ४५ धावांवर बाद केले. त्यानंतर पुजारा देखील स्वस्तात बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेला भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला सावरलं. अजिंक्य रहाणेने रविंद्र जाडेजाच्या मदतीने भारताला भक्कम स्थितीत नेलं. अजिंक्य रहाणेने सयंमी खेळी करत शतक ठोकलं. रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात एकेरी धाव घेताना संभ्रम निर्माण करत शतकवीर अजिंक्य रहाणेला धावबाद केलं. २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा करुन रहाणे बाद झाला. यानंतर आश्विनच्या सहाय्याने जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जाडेजाने ५७ धावा केल्या.
भारताचे अखेरच्या फळीतले फलंदाज थोडीफार झुंज देतील अशी अपेक्षा होती. परंतू स्टार्कने जाडेजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावून परतणं पसंत केलं. अखेरीस ३२६ धावांवर भारताचा पहिला डाव संपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नॅथल लियॉनने ३-३, पॅट कमिन्सने २ तर जोश हेजलवूडने १ बळी घेतला.