भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून भारताने इंग्लंड विरूद्धची कसोटी मालिका गमावली आहे. मॅचमध्ये खेळाडूंना काही खास कामगिरू करता आली नसून खास करूण बॅट्समन्सनी निराशाजनक कामगिरी केली आहे. या खराब कामगिरीचे खापर भारताचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांनी प्रशिक्षकांवर फोडले आहे. त्यांच्या मते भारताच्या बॅट्समन्सनी संपूर्ण मालिकेत त्याच त्याच चुका केल्या असून अशा वेळी प्रशिक्षक काय करत होते ? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
काय म्हणाले अझरुद्दीन?
भारताचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांनी भारताच्या इंग्लंड विरूद्ध कसोटी मालिकेतील पराभवाचे खापर संघाच्या प्रशिक्षकांवर फोडताना सांगितले की, “भारताच्या मालिकेतील पराभवाचे मुख्य कारण भारताची बॅट्समन्सनी केलेली खराब कामगिरी होती, सर्व बॅट्समन्सनी संपूर्ण मालिकेत त्याच त्याच चुका केल्या. अशावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक काय करत होते? तसेच विराट एकटाच संपूर्ण मालिकेत चांगला खेळला असला तरी आपण फक्त विराटवर अवलंबून राहु शकत नाही कारण हा एक सांघिक खेळ असल्याने सर्वांनी चांगला खेळ करणे जरूरी असते. त्यामुळे प्रशिक्षकांनीही आपल्या कामगिरीवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे”
आणि भारताने मालिका गमावली…
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने ३१ धावांनी विजय मिळवला त्या पाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडने तब्बल १५९ धावांनी विजय मिळवल्यानंतर इंग्लंड मालिका जिंकतो असे वाटत असताना भारताने मालिकेत कमबॅक करत तिसरी कसोटी तब्बल २०३ धावांनी जिंकली. मात्र चौथ्या कसोटीत भारताच्या पुजारा आणि कोहली यांना वगळता कोणालाही चांगली कामगिरी करता आली नसल्याने भारताला ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंग्लंडने मालिकेत ३-१ ची आघाडी घेतल्याने भारताच्या हातातून मालिका गेली आहे.