कर्णधार विराट कोहली, प्रमुख सलामीवीर रोहित शर्मा आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह इंग्लंड दौऱ्यावर जाणारे भारताचे खेळाडू मुंबईत बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारपासून (आज) त्यांच्या क्वारंटाईनच्या कालावधीला सुरुवात झाली. भारताचे खेळाडू आठ दिवस मुंबईमध्ये क्वारंटाईन होणार आहे. त्याचप्रमाणे भारताचा महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून महिला क्रिकेटपटू मंगळवारी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्या. पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे भारताच्या महिला क्रिकेटपटूही पुढील आठ दिवस भारतात क्वारंटाईन असणार आहेत. दोन्ही संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होतील. परंतु, त्याआधी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांच्या आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा रिपोर्ट तीनदा निगेटिव्ह येणे गरजेचे आहे.
इंग्लंड दौऱ्याला १८ जूनपासून सुरुवात
भारताचा पुरुष क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्याला १८ जून रोजी सुरुवात होईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारताचे सर्व खेळाडू क्वारंटाईन झाले आहेत. ‘कोरोनामुक्त झालेले प्रसिध कृष्णा आणि वृद्धिमान साहा दोन दिवसांपूर्वी बायो-बबलमध्ये दाखल झाले. आता विराट, रोहित आणि प्रशिक्षक शास्त्री हे मुंबईत राहणारे भारतीय संघाचे सदस्यही बबलमध्ये आले आहेत,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
कुटुंबियांना अजून परवानगी नाही
खेळाडूंच्या कुटुंबियांना मात्र अजून त्यांच्यासोबत इंग्लंडला जाण्याची परवानगी मिळालेली नाही. परंतु, परवानगी लवकरच मिळेल अशी बीसीसीआयला आशा आहे. ‘आमचे खेळाडू तीन महिने, तेसुद्धा बायो-बबलमध्ये कुटुंबियांविना राहू शकत नाहीत. ही गोष्ट खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य नाही,’ असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर खेळाडूंना किती दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.