श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार खेळी करून आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. मात्र त्यानंतरदेखील त्याच्यासाठी निराशाजनक स्थिती समोर आली आहे. आगामी आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला दिल्ली कॅपिटल्सकडून अय्यरला रिटेन करण्यास नकार दर्शवला आहे. अय्यरला डिसेंबर मध्ये होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत बाहेर काढण्यात आले आहे. माहितीनुसार रिषभ पंत व्यतिरिक्त दिल्ली फ्रँचायझीने अक्षर पटेल, एनरिक नोर्तजे आणि पृथ्वी शॉ यांना संघात कायम ठेवले आहे. नवीन नियमानुसार आयपीएल प्रशासकीय समितीने प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली आहे. शिखर धवन, कगिसो रबाडासारखे क्रिकेटपटूही दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले आहेत.
दरम्यान मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी श्रेयस अय्यरची दिल्लीच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती. आयपीएल २०१८ चे कर्णधार असलेल्या गौतम गंभीरला हंगामाच्या अर्ध्यातून या जबाबदारीतून काढून टाकले होते. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सनेही अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. आयपीएल २०२१ च्या पहिल्या सत्रापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान अय्यरला दुखापत झाली होती त्यामुळे त्याच्या जागेवर दिल्लीच्या कर्णधारपदी रिषभ पंतची वर्णी लागली होती.
रिषभ पंतला संघाने कर्णधार सोपवल्यानंतर यूएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात अय्यरचे संघात पुनरागमन झाले होते. मात्र त्याच्या पुनरागमनानंतर देखील अय्यरला कर्णधार पदापासून लांब रहावे लागले होते. सर्जरी झाल्यानंतर खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या अय्यरला दिल्लीच्या फ्रँचायझीने रिटेन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : Ind vs Pak : भारत वि. पाकिस्तान सामना ठरला सर्वाधिक लोकप्रिय; विश्वचषकातील सामन्याचा नवा विक्रम