‘एखाद्या बॅट्समनने डबल सेंच्युरी ठोकावी आणि तुम्ही त्याला पुढच्या टेस्टमॅचमधून डच्चू द्यावा, हे तुम्हाला पटतं का? पण त्याचवेळी हेही तितकंच खरं आहे की एका चांगला क्रिकेटर त्याही परिस्थितीमध्ये त्याचा परफॉर्मन्स सुरूच ठेवतो आणि त्याला पुन्हा बोलावलं जातं’, असं सांगत त्यांनी बीसीसीआयने त्यांना दिलेल्या वागणुकीची निर्भर्त्सना केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका ओळीच्या मेलमध्ये त्यांना BCCIने गरज नसल्याचं सांगितलं आहे. ‘आता तुमच्या कामाची गरज नाही, आम्ही दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आहे’, असं त्या मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं. क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – आयपीएल २०१९ भारताबाहेर होण्याची शक्यता
त्यांच्याशिवाय आयपीएलची बोलीच लागत नव्हती!
आयपीएल हा क्रिकेटचा महाबाजार म्हणता येईल. हा महाबाजार प्रत्येक क्रिकेट प्रेमीला ओळखीचा आहे. आणि त्याहून ओळखीचा आहे तो म्हणजे आयपीएल खेळाडूंचा लिलाव. या लिलावादरम्यान गेल्या १० वर्षांमध्ये खेळाडू बदलत राहिले, संघ बदलत राहिले, पण एक नाव कायम होतं..दर वर्षी. आणि ते नाव म्हणजे रिचर्ड मॅडली. यांचा आवाज आयपीएलच्या प्रत्येक लिलावामधून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला. त्यांच्या आवाजाशिवाय कोणत्याही खेळाडूची खरेदी-विक्री तर दूरच, साधी बोलीही लावली जात नव्हती. कारण रिचर्ड मॅडली आयपीएलच्या लिलावाचे हॅमर मॅन होते. अर्थात ज्यांच्या हातात लिलावाची हातोडी असायची आणि प्रत्येक खेळाडूची ते बोली सुरु करायचे.
फक्त एका ओळीचा मेल पाठवला!
पण आयपीएल सुरू झाल्यापासून गेली १० वर्ष आणि आयपीएलचे १० हंगाम खेळाडूंचा लिलाव करणाऱ्या रिचर्ड मॅडली यांना बीसीसीआयने अवघ्या एका ओळीचा मेल पाठवून अक्षरश: हाकललं आहे. ‘तुमच्या सेवेची आता आम्हाला गरज नाही, आम्ही दुसरा ऑक्शनिअर शोधला आहे’, एवढंच आ मेलमध्ये सांगण्यात आलं होतं.
हेही वाचा – मॅक्सवेल, फिंचची आयपीएल लिलावाकडे पाठ
साधे आभार देखील मानू नयेत?
यावरून रिचर्ड मॅडली दुखावले गेले आहेत. ‘ज्या माणसाने गेली १० वर्ष तुमच्यासाठी काम केलं, त्याच्याबद्दल कुणाचीही तक्रार नसताना, उलट सगळ्यांनी त्याचं कौतुकच केलेलं असताना तुम्ही निरोपाच्या मेलमध्ये साधे आभारदेखील मानू शकत नाहीत?’ असा सवाल मॅडली यांनी विचारला आहे. तसेच, ‘दुसऱ्या ऑक्शनिअरचा शोध सुरू आहे असं त्यांनी मला कळवलं होतं. मी तेही स्वीकारलं होतं. पण मला वाटलं माझ्या जागी त्यांना नवीन, तरुण आणि भारतीय चेहरा हवा असेल. पण त्यांनी निवड केली ती ह्यू एडमिडस, जे माझ्याहून वयस्कर आणि पोक्त आहेत’, असा आक्षेप मॅडली यांनी नोंदवला.
‘पुन्हा भारतात येणं कठीणच!’
दरम्यान, ‘असं झालं असलं, तरी मी पुन्हा भारतात परतण्याची आशा सोडलेली नाही. फक्त बीसीसीआयला त्यांची चूक नंतर मान्य करणं फार जड जाईल आणि म्हणूनच मी पुन्हा आयपीएलसाठी काम करणं कठीणच वाटतंय’, असं देखील मॅडली यांनी नमूद केलं.