इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी लोकेश राहुल आणि रोहित शर्मा ही टी-२० क्रिकेटमध्ये आमची प्रमुख सलामीची जोडी असल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले होते. परंतु, या मालिकेत आता भारतीय संघ २-१ असा पिछाडीवर पडला असून राहुललाही चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांत मिळून राहुलने केवळ १ धाव (१,०,०) केली, तर तो केवळ १४ चेंडू खेळपट्टीवर टिकू शकला आहे. त्यातच भारताकडे सलामीवीर म्हणून शिखर धवन आणि ईशान किशन यांचा पर्याय असल्याने राहुलवरील दडपण वाढत चालले आहे. मात्र, कर्णधार कोहलीने तिसऱ्या सामन्यानंतर राहुलची पाठराखण केली.
रोहितसह आमचा प्रमुख फलंदाज
राहुल चॅम्पियन खेळाडू असून त्याने भारतासाठी याआधी अप्रतिम कामगिरी केली आहे. मागील दोन-तीन वर्षांतील राहुलच्या कामगिरीवर नजर टाकल्यास आपल्याला कळेल की बहुधा जागतिक टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्याइतकी चांगली कामगिरी इतर कोणत्याही फलंदाजाने केलेली नाही. मागील दोन-तीन सामन्यांत त्याच्या धावा झाल्या नाहीत हे खरे असले, तरी वरच्या फळीत रोहितसह तो आमचा प्रमुख फलंदाज आहे. राहुलसारख्या खेळाडूला फार काळ रोखणे अवघड आहे, असे कोहली म्हणाला.
राहुलला लवकरच लय सापडेल
राहुलच्या कामगिरीची आम्हाला अजिबातच चिंता नाही. टी-२० क्रिकेटमध्ये फॉर्म फार महत्वाचा नसतो. तो अधिक आक्रमकतेने खेळला आणि काही चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध लागल्यावर तो पुन्हा धावा करण्यास सुरुवात करेल. टी-२० क्रिकेटमध्ये केवळ पहिले पाच-सहा चेंडू महत्वाचे असतात. तुम्ही ते खेळून काढले की धावा करणे सोपे होते. राहुलला लवकरच पुन्हा लय सापडेल याची मला खात्री आहे, असेही कोहलीने सांगितले.