दरवर्षी होणाऱ्या आयपीएल सामन्यात नेहमी कोणते ना कोणते वाद होत असतात. या वादांमुळे चर्चेत असलेल्या आयपीएल खेळात यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटॉर वीरेंद्र सेहवाग आणि संघाची मालकीण प्रीती झिंटा यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रीतीने नुकतेच ट्वीट करुन ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. आयपीएल सामन्यात किंग्ज इलेव्हन संघाच्या पराभवाचे खापर सेहवागच्या माथ्यावर फोडल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. मुख्य म्हणजे २०१४ ला आयपीएल सामन्यादरम्यान बॉयफ्रेंडने विनयभंग केल्याचा आरोप प्रीतीने केला होता. त्यावेळीही आयपीएल सामन्यात प्रीतीच्या संघाला पराभवाला तोंड द्यावे लागले होते.
वीरेंद्र सेहवाग हा मागील पाच वर्षांपासून किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत आहे. मंगळवारी झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंजाबला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर खेळाडू मैदानातून बाहेर येण्यापूर्वीच प्रीती झिंटाने पराभवाबद्दल सेहवागला जाब विचारला. अश्विनला करुण नायर आणि मनोज तिवारी यांच्या आधी फलंदाजीला पाठवण्यात आले. होते. या सामन्यात अश्विन शून्यावर बाद झाला होता. फलंदाजी क्रमातील अनावश्यक बदलामुळेच संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याचे प्रीतीचे म्हणणे होते. त्यामुळे पराभवाचा सारा दोष प्रीतीने सेहवागवर ढकलला. वीरेंद्र सेहवागने पंजाब संघाच्या अन्य मालकांना प्रीती झिंटाची अशी वागणूक सहन करणार नाही. प्रीतीकडून वारंवार जाब विचारण्याच्या पद्धतीमुळे सेहवाग कमालीचा दुखावला असल्याची चर्चा रंगली होती. या दोघांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
Mumbai Mirror gets it wrong again because we didn’t do Media net & pay them to write articles cuz that’s the only time they get it right. A conversation between Viru & me has been blown out of proportion & suddenly I’m a Villian ! Wow ! #fakenews https://t.co/qGOYhCiVtV
— Preity zinta (@realpreityzinta) May 11, 2018
आम्ही मीडियाला काही पैसे मोजत नसल्यामुळे चुकीची बातमी प्रसारित केल्या जातात. वीरु आणि माझ्या मधील संवाद चुकीचा असून मी अचानक खलनायिका ठरली असे ट्वीट मधून प्रीतीने लिहिले आहे.