आयसीसी टी २० विश्वचषकाचा थरार सध्या चालू आहे. त्यात अफगाणिस्तानच्या संघाचा देखील समावेश आहे. अफगाणिस्तानचा २५ ऑक्टोबरला सोमवारी स्कॉटलँड सोबत सामना झाला. शारजाहच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्रगीत झाले तेव्हा अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या डोळ्यातून अश्रू आल्याचे पहायला मिळाले. यातून तालिबान सरकार अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरूध्द कसे वर्तन करत आहे हे निदर्शनास आले. कारण पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला संघाच्या देशातील परिस्थिती आणि टी २० विश्वचषकात खेळण्याबद्दल विचारणा केली असता, राशिदने अत्यंत सावधगिरीने उत्तरे दिली, त्याच्या मनात भिती असल्याचे पहायला मिळाले.
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर देशाची परिस्थिती पूर्णत: बदलली आहे, अशातच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर त्यांच्याविरूध्द राशिदने आपला राग व्यक्त केला होता. पण पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यापूर्वी तालिबानच्या प्रश्नावर राशिद सावधपणे बोलताना दिसला. तर स्कॉटलँडविरूध्दच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत चालू असताना संघातील काही खेळाडूंना अश्रू अनावर झाल्याचे देखील पहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या देशाचा ध्वजही फडकावला, या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी तालिबानने संपर्क साधला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून राष्ट्रध्वजात बदल केला आहे तर राष्ट्रगीतावरही बंदी घातली आहे.
तालिबान्यांचा खेळाडूंना आदेश
संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालू असलेल्या विश्वचषकादरम्यान मैदानावर देशाचा ध्वज फडकवताना अथवा राष्ट्रगीत सुरू असताना आपल्या भावनांवर आवर घाला. अशा तीव्र शब्दांत तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूंना समन्स दिली. यावर बुधवारी संध्याकाळी खेळाडूंनी एक बैठक घेऊन तालिबान सरकारच्या सूचनांचे पालन करणे आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वचषकातील खेळण्याबद्दल राशिद म्हणाला…
“आता सर्व काही सुरळीत होत आहे, आता घरातीलही सर्व काही पूर्वपदावर येत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सर्व काही ठिक होईल, आम्ही इथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. एक चांगला संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही एवढीच एक गोष्ट आहे जी आमच्या हातात आहे. आम्ही एक चांगला संघ म्हणून चांगली खेळी करण्याचा पयत्न करत आहोत. क्रिकेटचे चाहते कसे याचा जास्तीत जास्त आनंद घेऊ शकतील आणि उत्सव साजरा करू शकतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.