भारतीय खेळाडूंनी यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली. भारताला या ऑलिम्पिक स्पर्धांत सात पदके जिंकण्यात यश आले आणि ही भारताची ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. आता मंगळवारपासून सुरु होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) अशीच विक्रमी कामगिरी करण्याचे भारताच्या पॅरा खेळाडूंचे लक्ष्य आहे. भारताने यंदाच्या पॅरालिम्पिकसाठी ५४ खेळाडूंचे पथक टोकियोला पाठवण्याचा निर्णय घेतला. या पथकात भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि उंच उडीत भाग घेणारा मरियप्पन थंगावेलु आदी स्टार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये भारत पदकांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
भारताचे चार खेळाडू क्रमवारीमध्ये अव्वल
टोकियोमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे अनेक निर्बंधांसह पॅरालिम्पिक स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. भारताचे खेळाडू नऊ क्रीडा प्रकारांत खेळणार आहे. भारताचे तब्बल चार खेळाडू त्यांच्या क्रीडा प्रकारात जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहेत. तसेच सहा खेळाडू दुसऱ्या, तर १० खेळाडू तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला १० हून अधिक पदके मिळतील अशी अपेक्षा आहे.
पॅरालिम्पिकमध्ये १२ पदके
भारताने १९७२ सालापासून पॅरालिम्पिकमध्ये खेळण्यास सुरुवात केली आहे. भारताला या स्पर्धांमध्ये आतापर्यंत १२ पदके जिंकण्यात यश आले आहे. २०१६ पॅरालिम्पिकमध्ये भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे यंदा पॅरालिम्पिक स्पर्धांत भारतीय पथकाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
हेही वाचा – बजरंग पुनिया जागतिक स्पर्धेला मुकणार; मोसमातून ‘आऊट’