भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. चौथ्या दिवसाची सुरुवातच पावसाने झाली होती. त्यामुळे आधी दिवसाच्या खेळाची सुरुवात उशिराने होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, पाऊस न थांबल्याने पहिले सत्र रद्द करण्यात आले. त्यानंतर पावसाची संततधार अधिकच वाढल्याने अखेर पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Day four of the #WTC21 Final has been abandoned due to persistent rain ⛈️#INDvNZ pic.twitter.com/QvKvzQCphG
— ICC (@ICC) June 21, 2021
पुढील दोन दिवसही पावसाची शक्यता
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आता चार दिवस पूर्ण झाले असले, तरी अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. परंतु, पुढील दोन दिवसही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंतिम सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. जागतिक क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ अव्वल, तर भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर असल्याने हा सामना कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते. परंतु, पावसामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे.
चारही दिवस पावसाची जोरदार बॅटिंग
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी केवळ ६४.४ षटके टाकली गेली. तिसऱ्या दिवशी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साधारण ७६ षटकांचा खेळ झाला. परंतु, पावसाला सुरुवात झाल्याने खेळ लवकर थांबवावा लागला. त्यानंतर चौथ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही.