केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्य-बाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अन्याय केल्याचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात निषेध राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोमवारी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी शहर शाखे समोर शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनात ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, शहर प्रमुख शरद पाटील, नारायण पाटील, प्रकाश जाधव, हेमंत चौधरी, पुरुषोत्तम चव्हाण, शांताराम गुळवे, मीना माळवे, आशा रसाळ, राधिका गुप्ते, सचिन राणे, दत्ताराम नार्वेकर, अरुण निंबाळकर, किरण निचळ, शांताराम दिघे, दीपक आजगावकर, परशुराम कदम, देवेंद्र प्रसाद, अशोक खंडागळे, रमेश यादव, प्रभाकर पाटील, प्रसाद अडुरकर, मनोहर राणे, अनिता दोडतले, बयाबाई मासरंकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. भाजपाकडून स्वायत्त संस्थेचा गैरवापर सुरू आहे. आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारची री ओढत केंद्रीय निवडणूक आयोगाचा देखील गैरवापर केल्याचा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र या निर्णयानंतर हा अतिरेक झाला आहे.
लोकशाही टिकवायची असेल तर नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन देखील ठाकरे गटाकडून मतदारांना करण्यात आले. राजकीय दबावाला बळी पडून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्य-बाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे समस्त शिवसैनिक संतप्त झाले असून रस्त्यावर उतरले असल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी दिली.