गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या दरवाढीची घौडदौड काही थांबायला तयार नाही. दरवाढीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. मोदींनी सांगितलेले अच्छे दिन देशाला आलेले नाहीत म्हणूनच विरोधकांनी १० सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमधील शिवाजी तळेकर या शेतकऱ्याला पेट्रोलच्या बाबतीत अच्छे दिन आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील डुडळगाव येथे तळेकर यांच्या शेतातील बोअरवेल मधून चक्क पेट्रोल येत आहे. त्यामुळे शहरात सध्या चर्चांना उधाण आले असून बोअरवेलचा मालक अच्छे दिन अनुभवत आहे. मात्र खरं प्रकरण वेगळंच आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील डुडळगाव येथे शिवाजी तळेकर यांच्या बोअरवेल मधून चक्क पेट्रोल निघत आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून त्याची पडताळणी करण्यासाठी माय महानगरचे प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले आणि खरंच असे काही प्रकरण आहे का? याची पाहणी केली. मात्र ज्या बोअरवेल मधून पेट्रोल निघत आहे. ते आता बंद असून पेट्रोलच्या वहनामुळे त्यांची मोटर खराब झाली आहे. परंतु तळेकर यांनी बोअरवेल मधून पेट्रोल येत असल्याचे खात्रीने सांगितले आहे.
मोदींनी सांगितलेले अच्छे दिन देशाला आले नाहीत. मात्र पिंपरी-चिंचवडमधील शिवाजी तळेकर या शेतकऱ्याला पेट्रोलच्या बाबतीत अच्छे दिन आले आहेत. बघा कसे… #BharatBandh #earthquake @AshokChavanINC pic.twitter.com/ubu5ngsipX
— My Mahanagar (@mymahanagar) September 9, 2018
नेमके प्रकरण काय आहे?
शिवाजी तळेकर यांच्या शेती शेजारी भारत पेट्रोल पंप असून पेट्रोल साठवणूक करणाऱ्या टाकिला गळती लागली होती. ते पेट्रोल जमिनीमध्ये झिरपले. अवघ्या ९० ते १०० मीटर अंतरावर असलेल्या शेतातील बोअरवेल मधून पाण्यासह पेट्रोल वर येत होते. भातशेती असल्याने तळेकर हे पाणी देत होते, परंतु भात शेती करपत असल्याने त्यांचा संशय बळावला आणि बोअरवेलच्या पाण्याची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी पाण्या बरोबर पेट्रोल ही येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पण यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
गेल्या १५ दिवसांपासून बोअरवेल मधून पेट्रोल येत असून बोअरवेलची मोटर देखील जॅम झाल्याने ती खराब झाली आहे. सध्या इथला भारत पेट्रोल पंप बंद केला असून पंपाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पण एकूणच काय तर बोअरवेल मधून चक्क पेट्रोल निघाल्याने येथील नागरिकांनी काही तास अच्छे दिन अनुभवले? असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
भात, बोअरवेल, मोटर असे एकूण ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून बोअरवेल मधून अचानक पेट्रोल येत होते. सध्या बोअरवेलमध्ये बिघाड झालाय. यामुळे मोटर जॅम होऊन नुकसान झाले आहे. भारत पेट्रोल पंपने नुकसान भरपाई द्यावी – शिवाजी तळेकर – शेतकरी