नागपूर – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत जात असून विधानसभा आणि विधान परिषदेतही याचे पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात जाताना खासदार धैर्यशील माने, हसन मुश्रीफ आणि संजय पवार यांना कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडवलं. यावरून राज्यात घमासान सुरू असताना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आपण महाराष्ट्रात राहतोय का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा – कर्नाटक सरकारची दडपशाही, केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत नक्की काय झालं? अजित पवारांचा सवाल
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. या चर्चेत दोन्ही राज्यांना परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितंले आहे. यादरम्यान कोणालाही कुठेही जाण्याची बंदी नसावी अशीही भूमिका जाहीर केली आहे. परंतु, तरीही आज नेत्यांना अडवण्यात आलं. आपण पाकिस्तानात आहोत का? हिंदुस्तानात कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार घटनेने दिलेला असताना आपण कर्नाटकात जात नसू तर ही भारत-पाकिस्तान सीमा आहे का?’ असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नी महाराष्ट्राच्या जनतेने, सरकारने आणि विधिमंडळाने याविषयांत लक्ष घालावं, असंही अंबादास दानवे म्हणाले. ‘या प्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मीही हजर होतो. या बैठकीत काही निर्णय घेतले त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली आहे. या बैठकीतच महाराष्ट्र सरकारने धर्मादाय निधी सुरू केला. काही दिवसांपूर्वी आपले काही मंत्री बेळगावाला जाणार होते, पण तारीख पुढे ढकलण्यात आली. आज कर्नाटक सरकार अशी भूमिका घेतेय. कर्नाटक सरकार दुटप्पीपणे वागतंय. त्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा एकत्रितपणे खंबीर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आंदोलनाचा करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण आपल्या वाहनांवर दगडफेक केली जातेय. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहून ही गाडी महाराष्ट्राची आहे असं समजून वाहनांना टार्गेट केलं जातंय. अशा वेळी पोलीस सहकार्य करत नाहीत, असंही अंबादास दानवे म्हणाले. तसंच, हे असंच सुरू राहिलं तर ईट का जवाब पत्थर से देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.