गुजरातच्या साबरकांठा येथे २८ सप्टेंबर रोजी १४ महिन्यांच्या चिमकुलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला. त्यानंतर गुजरातमध्ये युपी-बिहारींबाबत असंतोष उफाळून आला आहे. गुजरातच्या नागरिकांनी गुजरातमधून युपी, बिहारी कामगारांना हकालून द्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ५० हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याचे समजते. मात्र प्रशासनाने सणानिमित्त हे नागरिक गुजरातमधून बाहेर गेल्याचे सांगितले आहे.
साबरकांठा येथे एका 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याने गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. बलात्कारी आरोपी कामगार हा मूळ बिहारचा रहिवासी असल्याचे समोर आले. गुजरातमधील ठाकूर सेनेने सर्वप्रथम युपी व बिहारी नागरिकांविरुद्ध आवाज उठवला. तसेच या लोकांना येथे नोकरी न देण्याचे आवाहन करत त्यांना मारहाणही केली. त्यानंतर सोशल मीडियावरुन ही चळवळ तीव्र होऊन राज्यभर याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.
गुजराती नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे राज्यातील युपी-बिहारींना हाकलून लावण्याची मोहिमच गुजरातमध्ये सुरू झाली. पाहता-पाहता या आंदोलनाने मोठ रुप धारण केले असून अनेक ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करण्यात आली आहे. गुजरातमधील 6 जिल्ह्यांमध्ये या घटना प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यापैकी मेहसाणा जिल्ह्यात 15 गुन्हे दाखल झाले आहेत. तेथून 89 जणांना अटक करण्यात आली आहे. यासह सोशल मीडियावर हिंसात्मक पोस्ट शेअर करणार्या 6 जणांनाही अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 42 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 342 जणांना अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे. मात्र, सणानिमित्त हे नागरिक गावाकडे केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर जबाबदार
बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या मनात बिहारील नागरिकांविषयी एवढा द्वेष का आहे, असा सवाल जेडीयूने या पत्रामधून केला आहे.