सोमवारी बिहारची राजधानी पटणा येथे तब्बल ९५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून वधूचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पटणापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या पालीगंज भागात ही संपूर्ण घटना घडली आहे. याठिकाणी १५ जून रोजी एका विवाह सोहळ्यात हजेरी लावलेल्या वऱ्हाडी मंडळींपैकी ९५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील ८० जणांचा कोरोना रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय नवरा मुलगा गुरुग्राममध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता. नवरा मुलगा १२ मे रोजी लग्नासाठी आपल्या गावी पटना येथील डीहपाली गावी आला होता. यादरम्यान, कोविड -१९ ची लक्षणे त्यांच्यात आढळली, परंतु कुटुंबीयांनी त्याची कोरोना चाचणी न करता त्याचे लग्न लावून दिले.
दिलासादायक म्हणजे नवरीचा रिपोर्ट निगेटिव्ह
लग्नाच्या २ दिवसानंतर त्यांची तब्येत अधिक खालवली. त्यानंतर त्याला पटनाच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. जेव्हा जिल्हा प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीनंतर १५ जण कोरोनाने संक्रमित आढळले तर इतर ८० जणांचा रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला. दरम्यान, दिलासादायक म्हणजे कोविड -१९ च्या चाचणीत वधूला कोरोना संसर्ग झाला नाही आणि तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
प्रशासनाने म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकरणात कोविड -१९ च्या नियमांचे उल्लंघन केले होते. प्रशासनाने कोणत्याही विवाह सोहळ्यामध्ये केवळ ५० लोकांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे, परंतु या विवाह गावातील शेकडो लोक उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
यापुर्वी राजस्थानच्या भिलवाडा येथे एका विवाह सोहळ्यात २५० लोकांना बोलवून वराच्या कुटुंबातील सदस्यांना चांगलेच महागात पडले होते. लग्नाच्या मिरवणुकीत कोरोनाचा संसर्ग पसरल्याने लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित १५ लोकांना संसर्ग झाला. तर वराच्या आजोबाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती.