संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुरुवारी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. चीनने लडाखमधील सुमारे ३८ हजार चौरस किलोमीटर जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. चीन सोबत संबंध अधिक चांगले करता येतील आणि सीमेवरील वादावरही चर्चा केली जाऊ शकते परंतु सीमेवरील तणावाचे चर्चेवर परिणाम होतील, असं संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चीनच्या कारवायांवरून हे स्पष्ट झालं की चीनच्या बोलण्यात आणि कृतीत फरक आहे. याचा पुरावा म्हणजे चर्चा सुरु असताना २९-३० ऑगस्ट रोजी चीनकडून कारवाई करण्यात आली.
संरक्षणमंत्र्यांनी चीन-पाकिस्तान सीमा कराराचा हवाला देत पाकिस्तानने चीनला बेकायदेशीरपणे ५,१८० चौरस किलोमीटर भारतीय जमीन चीनला दिली. सिंह म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातही ९० हजार चौरस किलोमीटर जागेवर चीन दावा करत आहे. मे महिन्यात चीनने गलवानमध्ये भारतीय सैन्यांची गस्त थांबविली. भारतीय सैन्याने १५ जून रोजी गलवानमध्ये चीनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या सर्व घटनांदरम्यान सैनिकांनी संयम बाळगला पाहिजे तेथे संयम दर्शविला आणि जिथे शौर्याची आवश्यकता आहे तेथे शौर्य दाखवलं, असं संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं.
चीनने सीमेवर जी काही केलं आहे ते द्विपक्षीय करारांचे उल्लंघन आहे. चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव केली, जे १९९ आणि १९९६ मधील कराराविरूद्ध आहे. सीमा भागात शांतता राखण्यासाठी वास्तविक नियंत्रण रेषाचा सन्मान आवश्यक आहे. आमच्या सैन्याने करारांचे पूर्णपणे पालन केलं आहे. आम्हाला सर्व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे आहेत,” असं राजनाथ सिंह म्हणाले.
भारत चीनला त्यांच्या भाषेत उत्तर देणार
भारत वाटाघाटी करण्यास अनुकूल आहे परंतु नतमस्तक होणाऱ्यांमधला नाही. चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं असून दारू गोळा देखील जमा केला आहे. भारताने देखील मोठ्या प्रमाणात जवान तैनात केले आहेत. देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलण्यास आम्ही तयार आहोत, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.