कुठल्याही देशातील नागरिकांसाठी देशाचे राष्ट्रगीत ही अभिमानाची बाब असते. सर्वसामान्यपणे राष्ट्रगीत सुरू झाले की उभे राहाण्याची प्रथा आहे. परंतु मुंबईत राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाला आहे. आता एका विद्यापीठामध्ये विद्यार्थी राष्ट्रगीताला उभे न राहिल्यामुळे चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. ही घटना घडली आहे जम्मू काश्मीरमध्ये. श्रीनगरच्या ‘सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर’मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ जुलै रोजी विद्यापीठात दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी काही विद्यार्थी राष्ट्रगीत सुरू झाल्यावर देखील खुर्चीवर तसेच बसून होते.
व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रगीत सुरू असताना विद्यार्थी आपल्या खुर्च्यांवर बसून राहिले असल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी यासंर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली. त्यावर राष्ट्रगीताच्या वेळी मुख्य सभागृहातले सर्व विद्यार्थी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे होते. मात्र, काही विद्यार्थी बसलेलेच होते. मात्र, या व्हिडिओच्या सत्यासत्यतेची कोणतीही खातरजमा अद्याप होऊ शकलेली नाही.
#CORRECTION: Some students of Central University of Kashmir stay seated during the Indian national anthem at convocation ceremony (4.07.18) https://t.co/6AFUwZKuE3
— ANI (@ANI) July 5, 2018
शेर-ए-काश्मीर विद्यापीठावर आरोप
हा व्हिडिओ सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर युनिव्हर्सिटीतला आहे. परंतु या व्हिडिओला सोशल मीडियावर श्रीनगरच्याच एका शेर-ए-काश्मीर विद्यापीठाच्या नावानेही शेअर केले जात होते. मात्र, हा व्हिडिओ शेर-ए-काश्मीर विद्यापीठातला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण बुधवारी शेर-ए-काश्मीर विद्यापीठात दिक्षांत समारंभ नव्हता.
#WATCH Some students of Sher-e-Kashmir University stay seated during the Indian national anthem at convocation ceremony (4.07.18) pic.twitter.com/HU6f9otQiH
— ANI (@ANI) July 5, 2018
सामाजिक परिस्थिती बिघडलेली
गेल्या वर्षी राजौरीमधील शाह बादशाह विद्यापीठाचे दोन विद्यार्थी राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने गोंधळ झाला होता. काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या श्रीनगर भागात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता. अशा प्रकारांमुळे सामाजिक शांतता बिघडत असल्याचं चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. मात्र, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सदसदविवेक बुद्धीने निर्णय घ्यावेत असं आवाहन ‘माय महानगर’ टीमकडून सर्व वाचकांना करण्यात येत आहे.