कर्नाटक येथील सुलवाडी गावात किछुगुट्टी मरम्मा मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद खाऊन १५ भाविकांचा मृत्यू झाला होता. मागील काही दिवासांपासून पोलीस या प्रकरणी चौकशी करत होती. दरम्यान या प्रकरणी १ पुजाऱ्याला अटक करण्यात आली होती. मंदीर ट्रस्ट बरोबर वैमनस्य असल्यामुळे प्रसादात किटकनाशके टाकण्याची कबुली या पुजाऱ्याने दिली आहे. या प्रकरणी या पुजाऱ्याव्यतिरिक्त अन्य सात जणांवर गुन्हा नोंदवला गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रसाद खाल्ल्यानंतर भाविकांना अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागला होता. या सर्वांना ताबडतोब वेगवगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृतांमध्ये एका १५ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश होता.
कसा घडला प्रकार
सुलवाडी गावात गुरुवारी सकाळी किछुगुट्टी मरम्मा मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसाद खाल्ल्यानंतर भाविकांची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. जुलाब, उलट्या, मळमळ, पोट दुखीचा त्रास होऊ लागल्या होत्या.
“सल्लारु मठाचे हिमाडी महादेव स्वामी यांच्या अंतर्गत मंदिराचे सर्व काम सुरु होते. या ट्रस्टला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. मंदिरामुळे ट्रस्टला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. मिळालेल्या उत्पन्नाची योग्य नोंद ठेवण्यासाठी काही पुजाऱ्यांनी सांगितले होते. मात्र त्याला मिळणाऱ्या निधीचा हिशोब ठेवला गेला नाही. या मंदिराच्या पैशावरुन उदभवलेल्या वादामुळे या पुजाऱ्याने पायाभरणीच्या कार्यक्रमात प्रसादामध्ये किटकनाशके टाकली.” – तपास अधिकारी, कर्नाटक पोलीस
या घटनेनंतर हा पुजारी पसार झाला होता. मात्र पोलिसांनी तपास करुन पुजाऱ्याला अटक केली आहे. पुजाऱ्याकडे चौकशी केली असता ही धक्का दायक माहिती समोर आली.