मागच्या चार वर्षात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सामान्य जनतेच्या समस्यांसाठी सरकारला जबाबदार ठरविले. फडणवीस सरकारला ज्यांनी ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ अशी उपमा दिली, अवघ्या चार महिन्यात विखे पाटील ठंगाच्या गँगमध्ये जाऊन बसले आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी (१६ जून रोजी) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण ज्यांना मंत्रिपद दिले आहे, ते कधीही कुणाचाही हात धरु शकतात, हे सरकारने ध्यानात ठेवावे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावर केली.
मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्यांना मंत्रिमंडळात जागा
विरोधी पक्षनेता म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत अजित पवार यांनी सांगितले की, ५००० कोटींचा भ्रष्टाचार केला, असा आरोप मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी केला त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली आहे. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला, असे ते म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण ही देण्यासाठी सांगितले होते. आता मुख्यमंत्र्यांनीच त्यावर भाष्य करायला हवे, अशी आमची मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले.
विखे-पाटलांचे तोंड बंद करण्यासाठी मंत्रीपद दिले
कदाचित राधाकृष्ण विखे पाटील यांनी टोकाची टीका केली, त्यामुळे यांना पक्षात घ्या आणि यांचे तोंड बंद करा, म्हणून देखील त्यांना मंत्रिपद देऊन पक्षात घेतले असावे, असे देखील अजित पवार म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील हे सभागृहात नसल्यामुळे त्यांच्याबद्दल विधान करणे योग्य नाही. विखे पाटील उत्तर देऊ शकणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरील आरोप रेकॉर्डवरून काढून टाकावे, अशी विनंती एकनाथ खडसे यांनी केली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे आल्यानंतर त्यांच्यासमोर आरोप करावेत, म्हणजे ते उत्तर देतील असेही खडसे म्हणाले.