महाराष्ट्र-हरियाणा कनेक्शनमुळे भारनियमन टळले
नाशिक: राज्यात यंदा कडाक्याचा उन्हाळा आहे. मागील अनेक वर्षांपासून उन्हाळा आणि भारनियमन हे राज्यात जणू समीकरण बनले होते. परंतु, यंदा याला खो मिळाला आहे. कारण महाराष्ट्रात रात्रीच्या ३०० मेगावॅट वाढीव विजेची मागणी असते, ती हरियाणा राज्यातून पूर्ण होतेय, तर दिवसा हरियाणा राज्याला महाराष्ट्र तितकीच वीज पुरवत असल्याने हरियाणा राज्यातील नागरिकांनाही भारनियमनापासून मुक्तता मिळाली आहे.
सर्वाधिक वीजेचा वापर महाराष्ट्रात
शातील सर्व राज्यांच्या तुलनेते सर्वाधिक वीज वापरणारे महाराष्ट्र पहिले आणि त्या खालोखाल गुजरात राज्य आहे. महाराष्ट्रातील प्रचंड विजेची मागणी आहे, तसेच उन्हाळ्यात वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याने विजेची मागणी राज्याला पूर्ण करता येत नाही. त्यावर उपरोक्त रामबाण उपाय शोधण्यात राज्य सरकारला यश आल्याने नागरिकांना कधी नव्हे, तर यंदाचा उन्हाळा बऱ्यापैकी सुकर बनला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेशालाही वीज पुरवठा केला होता.
यंदा ७०० मे.वॅ. वाढीव विजेची मागणी
उन्हाळ्यात राज्यभर सुमारे २३,७०० मेगावॅट वीज वापरण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वीज ७०० मेगावॅट जास्त आहे. मुंबईत ३,२९२ मेगावॅट तर उर्वरित महाराष्ट्रात १९,४८५ मेगावॅट वीज वापरण्यात आली. राज्यात वीजनिर्मिती करणाऱ्या उत्पादन कंपन्यांनी ८,१४८ मेगावॅट वीज, खासगी कंपन्यांनी ४,९३३ मेगावॅट आणि एन.टी.पी.सी. ने ७,९१० एवढ्या विजेचे उत्पादन केले.