मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील समुद्र किनारी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.सुप्रसिद्ध फणसाड अभयारण्यालगत नांदगावसह अनेक गावे असून, या अभयारण्यात हिंस्त्र प्राण्यांचेही वास्तव्य आहे. अनेकवेळा हे प्राणी तेथून थेट मानवी वस्तीमध्ये घुसण्याच्या घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत. त्यामुळे या प्राण्यांची कायम दहशत अभयारण्य परिसरातील मानवी वस्तीत अनुभवयास येते. बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या समुद्र किनारी फेरफटका मारून गेल्याचे त्याच्या पावलांच्या ठशांवरून ग्रामस्थांच्या लक्षात आले आणि एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती समजताच नांदगावचे माजी उपसरपंच राजेश साखरकर, भाजपचे तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी तातडीने मुरुड वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा प्रकार कळविला. पाटील आणि त्यांचे सहकारी तातडीने समुद्र किनारी आले आणि त्यांनी त्या ठशांचे निरीक्षण करीत ते बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शैलेश दिवेकर, संजय गाणार यांच्या सहाय्याने पीओपीद्वारे ठशाचे नमुने घेतले.
पाटील यांनी सांगितले की, सदर बिबट्या रस्ता चुकून समुद्र किनारी आला असेल. मात्र त्याच्या लक्षात येताच तो जंगलाकडे परत गेला. हे जंगल भागाकडे जाण्याचे ठसे सापडल्यामुळे स्पष्ट होत आहे. मात्र ग्रामस्थांनी सावध राहून ग्रामपंचायतीने दवंडी देण्याची सूचना त्यांनी केली.