जायखेडा व परिसरात वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी असे शेतकऱ्याचे नाव असून जायखेडा – नांदिन रस्त्यावरील मेंढीपाडे शिवारातील गट नंबर १६२ / ३ च्या शेतातील राहत्या घरावर वीज पडली. यावेळी लागलेल्या आगीत झापासह लगतच्या कांद्याची चाळीतील ३०० क्विंटल कांदा, तसेच पिस्टन पंप, ठिंबक सिंचन, पाईपलाईन मटेरियल, इनलाईन मटेरियल, इत्यादींसह शेतीअवजारे व संसारोपयोगी सामान जळून खाक झाले आहे. ही घटना सोमवार, दि. १ जून रोजी सायंकाळच्या पाच वाजेच्या दरम्यान घडली. प्रसंगी शेतकरी रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी यांचे अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, या आगीमुळे या शेतकऱ्याचे अंदाजे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.