कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या आणि आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता लाचार सेना झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे गुजरातमध्ये गेले. शिवसेनेच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी कडाडून टीका केली आहे. शिवसेनेने भाजपासमोर अक्षरशः लोटांगण घातले आहे हे त्यांच्या जाण्याने समोर आले आहे. असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.
अमित शहा अडचणीत
अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एनडीएचे घटकपक्ष बोलावण्यात आले. यावरुन अमित शहा अडचणीत आहेत हे दिसून येत आहे. कालपर्यंत गांधीनगरमध्ये कुणीही प्रचाराला यायचे नाही ही भाजपची भूमिका राहिली होती. परंतु आज सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना बोलावून घेण्यात आले यावरुन अमित शहा हे अडचणीत आहेत हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.
भाजपासमोर लोटांगण
भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरूवातीला युती होणार की नाही?, असा प्रश्न उपस्थित राहीला होता. भाजपकडून युतीसाठी अनुकूल विधान होत होते. तर त्यावेळी शिवसेना मात्र आडमुठेपणा करत होती. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीविषयी चर्चा केल्यानंतर युतीची घोषणा करण्यात आली. कालपर्यंत शिवसेना पक्ष आडमुठेपणा करत होती आणि आज हाच पक्ष भाजपासमोर लोटांगण घातल्याचे दिसत आहे.