अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात होळीच्या दिवशी बैलांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत बैल जोराने पळावा यासाठी त्यांना तीक्ष्ण शस्त्रांनी टोचणे, मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिल-लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या आरोपावरून ५ अज्ञातांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बुधवारी सायंकाळी ५ वाजता होळीच्या पूर्वसंध्येला उसाटणे गावात काही गावकऱ्यांनी बैलांची शर्यत आयोजित केली होती. ही शर्यत पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. शर्यत जिंकणाऱ्या बैल आणि त्याच्या मालकांसाठी बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. शर्यत सुरु असतांना आपला बैल जिंकावा यासाठी प्रत्येकजण त्यांच्या बैलांना अमानुष वागणूक देत होता. त्यांना शस्त्रांनी टोचणे, मारहाण करणे हे प्रकार होत असल्याच्या तक्रारी हिल-लाईन पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ५ अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .