देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक ६६१ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत तब्बल ६६१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
असे आढळले नवे रुग्ण
- कल्याण (पू) : १२९, कल्याण (प): १७२
- डोंबिवली (पू) : १९०, डोंबिवली (प) :११८
- मांडा-टिटवाळा : १४
- मोहना : ३७
- पिसवली : १
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली क्षेत्रात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १२ हजारांवर पोहोचला आहे. सध्या ६ हजार २६९ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ६ हजार ३५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर क्षेत्रात आतापर्यंत १८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महानगरपालिका आयुक्तांनी लॉकडाऊनबाबत नवा आदेश काढला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २ जुलैला या भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन १२ जुलैपर्यंत असेल, असं सांगण्यात आलं होतं.
तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता अडीच लाखांच्या वर गेला आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार ८२७ नव्या रूग्णांची नोंद राज्यात झाली असून १७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत राज्यात २ लाख ५४ हजार ४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३२५ जण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १० हजार २८९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.