मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु असून या उत्तरपत्रिकांची सुरक्षाा धोक्यात आल्याची गंभीर घटना गुरुवारी समोर आली आहे. कलिना कॅम्पस येथील ज्या ग्रीन टेक्नॉलॉजीच्या इमारतीत उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग सुरु आहे. त्याठिकाणी शार्टसर्किंटमुळे युपीएसला आग लागल्याची दुर्घटना घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. गेल्यावर्षभरातील ही दुसरी घटना असल्याने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची धोक्यात आल्याचा आरोप युवा सेनेतर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, युवा सेनेचा हा आरोप विद्यापीठ प्रशासनाने फेटाळून लावला असून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही उत्तरपत्रिकांना हानी झालेली नसल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.
हे देखील वाचा – मुंबई विद्यापीठाला २५ हजारांचा दंड
मुंबई विद्यापीठाने उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगचे काम कलिना कॅम्पस येथील ग्रीन टेक्नॉलॉजीच्या इमारतीत सुरु आहे. पण याठिकाणी असलेल्या सुरक्षेवरुन सध्या मुंबई विद्यापीठ अडचणीत येण्याची शक्यता आहे. कलिना कॅम्पस येथील या इमारतीत गुरुवारी शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. या इमारतीत असलेल्या दोन युपीएसला आग लागली. शार्ट सर्किंटमुळे ही आग लागली आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थनी दाखल झाल्या आणि त्यांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने मोठी हानी टळली आहे. पण या घटनेने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या सुरक्षितेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरुन युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि शीतल शेठ यांनी याठिकाणी भेट देत पाहणी करीत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले आहे.
या आगीवरुन प्रशासनाला धारेवर धरताना मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत म्हणाले की, ज्याठिकाणी आग लागली त्याठिकाणी अग्निरोधक यंत्र नव्हते. शेजारील इमारतीतून हे यंत्र मागवून आग विझविण्यात आली. मुख्य म्हणजे, ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. या अगोदरही अशी आग लागली होती. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन किती गंभीर झालेली यावरुनच दिसून येत आहे. मुळात याठिकाणी ज्या पध्दतीने एसी आणि इतर साहित्य बसविले आहेत. ते अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहेत. त्याचीही दखल विद्यापीठाने घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याबद्दल मुंबई विद्यापीठाकडे विचारणा केली असता जनसंपर्क अधिकारी विनोद मळाले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. सर्व उत्तरपत्रिका सुरक्षित आहेत, कोणत्याही उत्तरपत्रिकांना हानी पोहचलेली नाही. ही आग छोटी होती. फक्त दोन युपीएस जळाले आहेत. ही आग जिथे लागली होती. त्याठिकाणी स्कॅनिंग खूपच दूर आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पण ही आग नेमकी कशी लागली याची चौकशी सुरु केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.