वसईच्या तुंगारेश्वर पर्वतावर असलेल्या बालयोगी सदानंद महाराज आश्रमावर होणारी कारवाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज एकवटला आहे. गुरुवारी सदानंद महाराजांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील आगरी-कोळी पारंपारिक वेशात ढोल-ताशांच्या गजरात पर्वतावर दाखल होणार आहेत. यात सर्वपक्षीय नेतेही सहभागी होणार आहेत.
सदानंद महाराज आश्रमाने वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा बांधकाम केले आहे. त्यामुळे हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात यावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आश्रमावर कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन बालयोगींच्या समर्थकांनी आश्रम वाचावा यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुुरू केले आहेत. आश्रमावर कोणत्याही क्षणी होणारी कारवाई लक्षात घेऊन बालयोगींच्या समर्थकांनी दररोज मोठ्या संख्येने पर्वतावर हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विरारमधून सुमारे दोन हजारांहून अधिक भक्त पारंपारिक वेशात ढोल-ताशांच्या गजरात पर्वतावर जाऊन बालयोगींना आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा दिलासा देणार आहेत. यासाठी आगरी सेनेने पुढाकार घेतला असून वसईतील सर्वपक्षीय नेते यात सहभागी होणार आहेत.
तुंगारेश्वर पर्वतावरील 69 गुंठे जागा राज्य सरकारने ट्रस्टला दिलेली आहे. याठिकाणीच आश्रम बांधण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर दिलासा मिळावा यासाठी अपिल करण्यात आलेले आहे. याप्रकरणी राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्रांचे श्रद्धास्थान असलेल्या बालयोगी सदानंद महाराजांच्या आश्रमावर घाईघाईत कारवाई होऊ नये. अशीच आमची मागणी आहे, असे आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले.