महापालिकेचा ई-विभाग अर्थात भायखळा विधानसभा क्षेत्रात करोना कोविड बाधित पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आल्यानंतर, सुरुवातीला पहिल्या तीन क्रमकांवर असलेल्या या विभागाने १० एप्रिलनंतर आपला दुसरा क्रमांक सोडलेलाच नाही. या विभागात बाधित रुग्णांची आणि मृतांचा आकडाही वाढत असताना दोन सहायक आयुक्तांची उचलबांगडी करत अनुभवाने नवख्या असलेल्या सहायक आयुक्ताच्या हाती या विभागाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आलेले अपयश आणि महापालिकेची सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी कोरोनाशी चार हात करण्यासाठी रस्त्यांवर उतरलेले असतानाच सोशल डिस्टन्सिंगवर नियंत्रण ठेवण्यात आलेल्या अपयशामुळेच भायखळ्यात आजही करोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे या विभागात निमलष्करी दलाची मदत घेण्याची मागणी होत आहे.
भायखळा,मदनपुरा, नागपाडा, दारुखाना,माझगाव, चिंचपोकळी या भायखळा विधानसभा क्षेत्र असलेल्या आणि महापालिकेच्या ई विभाग कार्यालयाच्या हद्दीत आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या २४३८ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १४२ पोहोचली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासून हा विभाग पहिल्या तीन क्रमांकावर होता. सुरुवातीला चिंचपोकळी, माझगाव आदी भागांपासून रुग्ण सापडण्यास सुरुवात झाले. त्यानंतर मग मदनपुरा,नागपाडा, साखळीपाडा, नया नगर, मोदी कंपाऊंड,दारुखाना, माझगाव,ताडवाडी आदी ठिकाणच्या रुग्णांची भर पडत गेली. हा विभाग ७० टक्के मुस्लिम बहुल आहे. आणि याच विभागात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत होता.
आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ७० ते ८० टक्के रुग्ण हे याच समाजातील आहेत. सुरुवातील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये महापालिकेच्या अधिकार्यांना योग्यप्रकारे सहकार्य केले जात नव्हते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि नर्सला योग्यप्रकारे सहकार्य होत नसल्याने प्रारंभीपासून अशा वस्त्यांमध्ये हा आजार पसरत गेला. परंतु आता मुस्लिम समाजातील लोकांकडून महापालिकेच्या अधिकार्यांना,डॉक्टर्सना योग्यप्रकारे सहकार्य केले जात आहे. ज्यामुळे बाधित रुग्णांचा शोध घेणे हे आता सोपे होऊ लागले आहे.
* एकूण रुग्णांची संख्या : २४३८
* बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ८०३
* एकूण मृतांची संख्या : १४२
* होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या: १० हजार ८८९
* संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या : ६७४
बर्याच वेळा लोकांच्या भावनांचा विचार करत लोकप्रतिनिधींना जनतेपुढे नमते घ्यावे लागते. या विभागात काही जण याचे राजकारण करू पाहत आहेत. परंतु ही वेळ राजकारणाची नसून पालिका आणि पोलिस यंत्रणेसोबत काम करण्याची आहे.
-यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती.
राजकीय हस्तक्षेपामुळेच या ई -विभागाची वाट लागली आहे. माझ्या प्रभागात सुरुवातील जास्त रुग्ण आढळून आले होते. परंतु आता माझ्या प्रभागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आता भायखळा पश्चिम विभागात रुग्ण कमी आणि पूर्व बाजुस जास्त असे प्रमाण पहायला मिळत आहे.
-रईस शेख, नगरसेवक, समाजवादी पक्ष.
भायखळा विधानसभा क्षेत्रात प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे. विशेष म्हणजे प्रशासन या आजाराबाबत प्रत्येक दिवशी नियम बदलत चालली आहे. परिणामी अधिकारी व नगरसेवकांमध्ये नेहमीच हमरीतुमरी होत आहे. मात्र, प्रशासन अजुनही नगरसेवकांना विश्वासात घेत नाही,ही दुर्देवाची बाब आहे.
-सुरेखा लोखंडे, नगरसेविका, भाजप.