रेल्वेमध्ये फुकट्या प्रवाशांवर टीसीकडून कारवाई केली जाते. ही कारवाई करताना अनेकदा प्रवाशांकडून टीसींना मारहाणही होते. असे असेल तरी मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या शारदा विजय यांनी धडाकेबाज कामगिरी करत 24 वर्षांत सर्वाधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मध्य रेल्वेकडून त्यांना गौरवण्यातही आले आहे.
मूळच्या हैदराबादच्या असलेल्या शारदा विजय यांनी 1994 मध्ये मध्य रेल्वेमध्ये टीसी म्हणून कामाला लागल्या. सोलापूर येथे त्या प्रथम रुजू झाल्या. सोलापूर विभागातील पहिली महिला टीसीचा मानही त्यांच्या नावावर आहे. त्यानंतर १९९५ मध्ये त्याची मुंबई विभागात बदली झाली. तेव्हापासून म्हणजे जवळपास २३ वर्षांपासून त्या मुंबई विभागात महिला टीसी म्हणून कार्यरत आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांना पकडणे हे एक आवाहनात्मक काम आहे. मात्र शारदा विजय यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत अन्य सहकार्यांपेक्षा अधिक फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मध्य रेल्वेने त्यांना पुरस्काराने गौरवले आहे. रेल्वे प्रशासनाने महिलांवर सोपवलेली जबाबदारी कौतुकास्पद आहे. महिला तिकीट तपासनीस स्त्रियांबरोबरच पुरुष प्रवाशांचे तिकीटही तपासतात. सुरुवातीला त्रास झाला, मात्र सहाकार्यांचा पाठिंबा, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि अनुभव यातून बरेच काही शिकता आले. भारतीय रेल्वेमध्ये महिलांच्या कलागुणांसोबत त्यांना सक्षमही बनविले जाते.