माहेरपणासाठी आलेल्या गौराईचे आज गणरायासोबत विसर्जन होणार आहे. गणपती पाठोपाठ शनिवारी गौराईच आगमन झालं होत. तीन दिवस या माहेरवाशीणीचे लाड पुरवल्यानंतर आज तिची पाठवण केली जाणार आहे. तर गणपती बाप्पाचेही पाचव्या दिवसाचे विसर्जन होणार आहे. गेल्या आठवड्यात गुरूवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या गजाननाचे विसर्जन झाले. प्रामुख्याने घरोघरी विराजमान असलेल्या बाप्पाला दीड दिवसानंतर तर काहीजण पाच दिवसानंतर निरोप देतात. शिवाय काहींच्या घरातील गणरायाला सातव्या दिवशीही विसर्जीत केले जाते.
वाजतगाजत मिरवणूक निघणार
काही सार्वजनिक मंडळ तर बहुतांश घरगुती गणपतींचे विसर्जन आज होणार आहे. दुपारी तीननंतर विसर्जनाच्या मिरवणूका निघतील. वाजतगाजत, ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणूकांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’, या जयघोषात आपल्या बाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यावेळी माहेरपणाला आलेल्या गौराईचेही विसर्जन होणार आहे. मुंबई ही समुद्र किनाऱ्याने वेढलेली आहे. त्यामुळे बहुतांश भाविक आपल्या बाप्पाचे विसर्जन या समुद्रातच करतात. त्यामुळे मुंबईतील काही ठराविक समुद्र किनारी आपल्याला विसर्जनाचा सोहळा पााहायला मिळेल. यामध्ये चर्नी रोड येथील गिरगाव चौपाटी, विलेपार्लेतील जुहू चौपाटी, दादरमधील शिवाजी पार्क येथील चौपाटी, मालाडमधील मढ, आक्सा आणि मार्वे हे दक्षिण मुंबई तसेच उपनगरातील महत्त्वाचे समुद्र किनारे आज गौरी-गणपती विसर्जन सोहळ्याने फुलून जातील. तर काही सार्वजनिक तलावांमध्येही घरगुती छोट्या आकारातील गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. कोणाकडे एक तर कोणाकडे दोन गौरी बसवली जाते. तर काहींच्या घरी गणपती बाप्पा नसले तरीही गौरीचे आगमन होते.