देशात सध्या कोरोना व्हायरससह टोळधाडीचे संकट आले असून पाकिस्तानमधून आलेल्या या टोळधाडीने जवळजवळ उत्तर भारत काबीज करत आता ते महाराष्ट्रात धडकले आहे, असे सांगण्यात येत आहे. आफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातल्या अनेक राज्यांमधील पिकांचे नुकसान करणारी ही टोळधाड आता मुंबईत दाखल झाली आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. या व्हायरल होत असलेल्या फेक फोटो व व्हिडिओवर स्पष्टीकरण देत बीएमसीने (BMC) टोळधाडीचे हे फोटो आणि व्हिडिओ मुंबईमधील नसल्याचे सांगितले आहे.
मुंबईला टोळधाडीचा धोका नाही
मुंबई महापालिकेच्या आपातकालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (LWO) गुरुवारी स्पष्टीकरण दिले की, टोळांची झुंड ही पूर्व महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असणार आहे, मुंबईकडे ते येऊ शकत नाहीत. टोळधाडीचे हे आक्रमण पूर्व महाराष्ट्राच्या काही भागात मर्यादित राहणार आहे व त्यामध्ये विदर्भातील जिल्हे बाधित होतील. मध्य प्रदेशातील वाऱ्याची दिशा ही टोळांची हालचाल फक्त त्याच भागात मर्यादित ठेवण्यास अनुकूल आहे. तसेच हा झोन त्यांच्या अन्न उपलब्धतेसाठी अनुकूल आहे, असे सांगण्यात येत आहे.
Palghar district administration in Maharashtra issues advisory, asks farmers and officials to be prepared to tackle any possible locust infestation
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भात टोळ कीटकांचे आक्रमण पाहता राज्यातील पालघर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी, शेतकरी व अधिकाऱ्यांना पिकांवर होणार्या कोणत्याही हल्ल्याला सामोरे जाण्यास तयार होण्यास सांगितले. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी अधिकृत संदेशात, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोळांच्या अतिक्रमापासून आपले उभे पीक वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.